पोषण आहारात सुधारणा! दररोज ₹६.७८ ते ₹१०.१७ इतका खर्च मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 16:03 IST2025-06-24T16:02:59+5:302025-06-24T16:03:35+5:30
Bhandara : १ मेपासून सुधारित दर लागूः शाळेत मिळणार आहार

Improvement in nutritional intake! Daily expenditure of ₹6.78 to ₹10.17 approved
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शालेय पोषण आहार योजनेतील प्रति विद्यार्थी खर्चात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा सुधारित दर १ मे २०२५ पासून लागू करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक पौष्टिक आहार मिळण्यास मदत होणार आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतून इयत्ता पहिली ते पाचवी या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त, तसेच सहावी ते आठवीमधील उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो.
योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन, प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो. आता केंद्र शासनाने प्रतिदिन, प्रति लाथार्थी आहार खर्चाच्या दरात वाढ करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ४ मार्च २०२५ च्या शासन निर्णयान्वये प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी ६.१९ रुपये व उच्च प्राथमिक वर्गासाठी ९.२९ रुपये निश्चित करण्यात आली होती.
१ मेपासून सुधारित दरानुसार मिळणार पैसे
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आहार खर्चाच्या दरास मान्यता मिळाली आहे. १ मेपासून सुधारित दरानुसार पैसे मिळणार आहेत.
प्रति विद्यार्थी किती वाढ ?
नव्या शासन निर्णयानुसार प्रतिदिन, प्रति लाभार्थी आहार खर्च प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी ६.७८ रुपये, तर उच्च प्राथमिक लाभार्थी गटासाठी १०.१७रुपये एवढे दर निश्चित करण्यात आले आहे.
तेल-मिठासाठी खिशातून करावा लागायचा खर्च
यापूर्वी शाळेत पोषण आहार शिजविण्यासाठी अनेकवेळा निधीअभावी शिक्षकांनाच तेल-मिठाचा खर्च करावा लागायचा. आता शिक्षकांना स्वतःच्या खिशातून करावा लागणारा खर्च वाचण्यास मदत मिळणार आहे.
किती विद्यार्थ्यांना लाभ ?
पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टळली.