लग्न स्वागत सोहळ्यात अन्नातून २०० जणांना विषबाधा; लाखांदूर तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2022 17:19 IST2022-12-02T17:15:44+5:302022-12-02T17:19:12+5:30

पोटदुखी, उलटी, हगवणीचा त्रास, आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल; सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर

200 people poisoned by food at wedding reception in Sarandi of Lakhandur Taluka | लग्न स्वागत सोहळ्यात अन्नातून २०० जणांना विषबाधा; लाखांदूर तालुक्यातील घटना

लग्न स्वागत सोहळ्यात अन्नातून २०० जणांना विषबाधा; लाखांदूर तालुक्यातील घटना

दयाल भोवते

लाखांदूर (भंडारा) : लग्न स्वागत सोहळ्यातील अन्नातून सुमारे २०० जणांना विषबाधा होण्याचा प्रकार तालुक्यातील सरांडी बुज. येथे उघडकीस आला. बुधवारी रात्री भोजन केल्यानंतर काहींना गुरूवारी त्रास व्हायला लागला. तर शुक्रवारी अनेकांना पोटदुखी, उलटी, हगवणीचा त्रास सुरू झाला. खासगी रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात असून सर्वंची प्रकृती धोक्याबाहेर आहे. आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले आहे.  

सरांडी येथील मदन नामदेवराव ठाकरे यांच्या मुला विवाह २९ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील किन्ही येथे पार पडला. त्यांनतर दुसऱ्या दिवशी बुधवार ३० नोव्हेंबर रोजी सरांडी येथे स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळच्या सुमारास या कार्यक्रमात किन्ही, सरांडी सह नजीकच्या गावातील पाहुण्यांनी हजेरी लावली. मात्र गुरूवारी सकाळी काहींना उलटी, पोटदुखी, हगवण, मळमळीचा त्रास जाणवू लागला. त्यांनी सरांडी प्राथमिक आरोग्य केंद्रासह खाजगी रुग्णालयांत धाव घेतली. मात्र शुक्रवारी सकाळी अनेकांना त्रास जाणवू लागला. त्यांनी सरांडी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली.

यावेळी रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. तसेच बाधित रुग्ण शोधण्यासाठी मोहीम राबविणल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. दोन दिवसापूर्वी घेतलेल्या भाजनातून विषबाधा झाल्याचे पुढे आले असून गावातील सात ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बोलावून त्यांची वैद्यकीय तपासणी केली. यात काही विद्यार्थ्यांना पोटदुखी व हगवणीचा त्रास असल्याचे सांगण्यात आले.

सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर

गुरूवारी ८ रुग्ण तर शुक्रवारी सुमारे ६० जणांवर आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. यातील सर्वच रुग्ण किरकोळ बाधित होते. तर तीन रुग्णांना सलाईन लावण्यात आली. दोन दिवसांत आलेल्या सर्वच विषबाधित रुग्णांनी प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकारी विवेक बन्सोड यांनी सांगितले.

अन्नातून विषबाधा झाल्याची घटना तब्बल दोन दिवसानंतर उघडकीस येताच गावातील जवळपास ७ विविध ठिकाणांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. अन्नाचे व तेलाचे नमुने सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात परिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहेत. आशा वर्कर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून गावात सर्वेक्षण करण्यात आले आहे.

- डॉ. विवेक बनसोड, वैद्यकीय अधिकारी, सरांडी  

Web Title: 200 people poisoned by food at wedding reception in Sarandi of Lakhandur Taluka