अखेर अचलपूर नगरपालिकेचे मुंबईच्या कंपनीला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 15:42 IST2024-06-06T15:40:19+5:302024-06-06T15:42:18+5:30

Amravati : शहरातील रस्ता वाहतुकीचा अडथळा दूर करण्याचे आदेश

Finally Achalpur Municipality's letter to Mumbai company | अखेर अचलपूर नगरपालिकेचे मुंबईच्या कंपनीला पत्र

Finally Achalpur Municipality's letter to Mumbai company

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा :
शहरात १२७ कोटी रुपये रस्तेनिर्मितीच्या कामात वाहतुकीची ऐशीतैशी झाली. १५ दिवसांपासून त्यावर पालिकेच्यावतीने स्वतःहून दखल घेतली गेली नाही. बुधवारी 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच अचलपूर नगरपालिकेने मुंबईच्या निया इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला पत्र देऊन वाहतुकीतील अडथळे तत्काळ दुरुस्त करण्याचे आदेश दिले. परतवाडा शहरात महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजना (राज्यस्तर) अंतर्गत शहरातील तब्बल २६ विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी रस्त्यांचे काम हे शहरातील मध्यभागात सुरू असल्याने नागरिक तसेच व्यावसायिकांना रहदारीस अडचण निर्माण होत आहे. रस्तेविकासाची कामे नागरिकांच्या जिवावर उठली आहेत. अचलपूर नगर परिषदेने पत्र बजावण्यात आले असून त्यामध्ये तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.


पालिका म्हणते, तत्काळ उपाययोजना करा
जयस्तंभ चौक ते मिश्रा चौकापर्यंत व इतर ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांचे बांधकामाचा त्रास होऊ नये व वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, याकरिता बॅरिकेडिंग लावण्यात यावे व आवश्यक ते सूचनाफलक लावून काम करण्यात यावे, असे पत्र मुख्याधिकारी धीरज गोहाड यांनी दिले


"शहरातील मुख्य मार्गावर फलक व इतर उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत."
- अरविंद गोठवाल, बांधकाम अभियंता, अचलपूर नगरपालिका


सुरक्षा रक्षक का नाही?
जयस्तंभ ते गुजरी बाजार मिश्रा चौकापर्यंत अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. या ठिकाणी सकाळ व सायंकाळी मोठ्या संख्येने चारचाकी वाहने आतमधून जात असताना सुरक्षारक्षक नसल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. पालिकेच्या आदेशानंतर कुठली कारवाई होते, यावर नागरिकांच्या नजरा खिळल्या आहेत.
 

Web Title: Finally Achalpur Municipality's letter to Mumbai company