मराठवाड्यात रविवारी सकाळपर्यंत काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत वादळी वारा आणि पावसामुळे पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे.
तर काही ठिकाणी वीज पडून जीवितहानी व जनावरांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून, विभागीय प्रशासन जिल्हानिहाय माहिती घेत आहे. परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे मराठवाड्याच्या काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. पावसामुळे तापमानात काही प्रमाणात घट होऊन उष्णतेची लाट कमी झाली आहे, परंतु शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
तापमान पुन्हा वाढणार...
• मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने 'यलो अलर्ट' दिला. धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांत अवकाळी पाऊस होऊ शकतो.
• विदर्भातील सहा ते सात जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील तापमानात सध्या काही प्रमाणात घट झाली. मात्र यानंतर पुन्हा एकदा तापमानात वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
१२ मेपर्यंत असेच वातावरण
१२ मेपर्यंत सध्या आहे, तसेच वातावरण राहिल. त्यानंतर, तापमान वाढेल. अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत. शहरातही काही भागांत रिमझिम पाऊस झाला. - श्रीनिवास औंधकर, हवामानतज्ज्ञ.
हेही वाचा : तुम्हालाही नैसर्गिक गरजेपेक्षा अधिक घाम येतो का? काळजी घ्या; गंभीर आजरांचा धोका अधिक
