टेंभुर्णी : उजनी धरणात मिसाळणारा दौंड येथील विसर्ग मोठ्या प्रमाणात घटला आहे. पंढरपूर येथील संभव्य पुराचे संकट तूर्तास टळले आहे.
दौंड येथून १५ हजार ५०२ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत असून धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनीतून रविवारी दुपारी आणखी ५ हजार क्युसेक विसर्ग वाढवून २५ हजार करण्यात आला आहे.
रविवारी सायंकाळी धरणाची पाणी पातळी ७६.९८ टक्क्यांपर्यंत ठेवण्यात यश मिळाले आहे. पंढरपूर येथील पाणी पातळी १५ क्युसेकपर्यंत वाढली असून नीरा नरसिंहपूर येथील पाणी पातळी ३० हजार क्युसेकपर्यंत आहे.
भीमा खोऱ्यातील पाऊस थांबल्यामुळे बंडगार्डन येथील विसर्गात देखील मोठी घट झाली आहे. येथून सध्या ६ हजार ५९२ क्युसेक विसर्ग सुरू आहे.
भीमा खोऱ्यातील घोड धरणातून ५ हजार ५०० क्युसेक, तर खडकवासला धरणातून २ हजार क्युसेक विसर्ग मुळा मुठा नदीत सोडला जात आहे. पंढरपूर आषाढीवारीमुळे उजनी पाणी पातळी स्थिर ठेवण्याचे प्रयत्न उजनी धरण व्यस्थापन करत आहे.
सध्या धरणात एकूण १०४.९० टीएमसी पाणीसाठा असून ४१.२४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा धरला आहे. उजनीतून भीमा नदीत वीज निर्मिती १ हजार ६०० क्युसेक, उजनी मुख्य कालवा ५०० क्युसेक, भीमा सीना जोड कालव्यातून ४०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.
अधिक वाचा: १५ दिवसांत या चार कारखान्यांकडून ऊस उत्पादकांचा एफआरपीचा हिशोब चुकता