उत्तर भारतातील उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह महाराष्ट्रात निर्माण झालेली उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती शनिवारसह रविवारीही कायम राहणार आहे.
त्यानंतर मात्र या क्षेत्राचा परिणाम कमी होणार असला तरी तापमान चढेच राहणार असून, हवामान बदलामुळे पडणारा पाऊस किंचित दिलासा देण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अमरावती आणि वर्धा येथे ४४.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे, तर मुंबई ३३-३४ अंशावर स्थिर असली तरी हवेतील आर्द्रता मुंबईकरांना घाम फोडत आहे.
ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले, पुढील तीन ते चार दिवस कमाल तापमान अधिक असेल. विदर्भात ४२, मराठवाडा आणि लगत ४० व कोकणात ३६ च्या आसपास तापमान नोंदविले जाईल.
तर हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस कोकण पट्टयात आर्द्रता ६०-७० टक्क्यांदरम्यान राहील. मुंबईसह किनारी भागात तापमान ३४-३६ अंशांदरम्यान असेल.
कोकणातील अंतर्गत भाग आणि महामुंबईत तापमान ३६-३८ अंशांपर्यंत जाऊ शकते. घाटाच्या पायथ्याजवळील भागात तापमान सुमारे ४० पर्यंत पोहोचू शकते.
मध्य महाराष्ट्रात रविवारपासून तापमानात थोडी घट होऊन ते ३६-३८ दरम्यान राहील. विदर्भमध्येही रविवार किंवा सोमवारपासून तापमान ४०-४२ अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात पाऊस?
◼️ पुण्यासह संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडामध्ये संध्याकाळच्या सुमारास हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडतील. या काळात ५ ते ४० मिमी पावसाची नोंद होऊ शकते.
◼️ संपूर्ण घाट विभागात अनुकूल परिस्थितीमुळे मेघगर्जना होईल. याचा प्रभाव रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि दक्षिण रायगडपर्यंत जाणवू शकतो.
◼️ उत्तर कोकण आणि महामुंबईत १९, २१ आणि २२ एप्रिल रोजी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडतील.
कुठे किती तापमान?
अमरावती - ४४.४
नागपूर - ४४
छ. संभाजीनगर - ४१.६
सातारा - ४०.८
नाशिक - ३८.४
कोल्हापूर - ३८.१
मुंबई - ३३.१
अधिक वाचा: बदललेल्या शक्तीपीठ महामार्गामुळे 'या' ३४ गावांतील जमिनीच्या किमतीत दुपटीने वाढ; एकरी काय दर?
