Maharashtra Rain Update: राज्यात सध्या हवामानाचा दुहेरी खेळ पाहायला मिळत असून एका बाजूला कडाक्याचे ऊन तर दुसऱ्या बाजूला वादळी पावसाचा तडाखा अशी स्थिती निर्माण झाली आहे.(Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध भागांसाठी यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.(Maharashtra Weather Update)
कोकण-मुंबईत उष्णतेची लाट
मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात उष्णता आणि आर्द्रतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अरबी समुद्राकडून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे उकाडा अधिकच वाढला आहे.
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी तापमान ३६ अंशांच्या पुढे गेले असून सांताक्रूझ येथे ३६.६°C तर कुलाबा येथे ३४.२°C तापमानाची नोंद झाली. पुढील तीन दिवसांत तापमानात आणखी २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्येही उष्ण व दमट हवामान कायम राहणार असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा
दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून विदर्भ ते मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.
यामुळे पुढील २४ तासांत सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. या भागात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात.
विदर्भात तापमानाचा उच्चांक
राज्यातील सर्वाधिक तापमान सध्या विदर्भात नोंदवले जात आहे. अकोला येथे ३९.४°C तापमानाची नोंद झाली असून हे देशातील सर्वाधिक तापमान ठरले आहे.
त्यापाठोपाठ अमरावती ३८.४°C, ब्रह्मपुरी ३८.१°C आणि यवतमाळ येथे ३८°C तापमान नोंदवले गेले. तर नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे राज्यातील नीचांकी १४.४°C तापमानाची नोंद झाली आहे.
हवामानातील बदलामागील कारणे
हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर कर्नाटक ते तामिळनाडूपर्यंत पसरलेल्या वाऱ्याच्या खंडित प्रवाहामुळे आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात ही अस्थिर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काही भागात उष्णता तर काही भागात पावसाचे वातावरण तयार झाले आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
* दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे
* भरपूर पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवावे
* बाहेर पडताना डोके झाकावे व हलके, सुती कपडे वापरावेत
* वादळी पावसाच्या वेळी झाडांखाली उभे राहू नये
* विजांच्या कडकडाटावेळी इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर राहावे
राज्यातील हवामानातील ही अस्थिरता पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : राज्यात हवामान बदलणार? की उन्हाचा पारा आणखी चढणार!
अधिक वाचा : Soil Fertility : अन्नच विषारी बनतेय! शेतीतल्या 'या' मोठ्या चुकीमुळे वाढतोय धोका
