Maharashtra Weather Update :राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा कायम असून राज्यातील अनेक भाग उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात सापडले आहेत.(Maharashtra Weather Update)
एप्रिलअखेर तापमानात थोडी घट झाली असली तरी वातावरणातील उष्णता आणि कोरडेपणा अद्यापही कायम आहे.(Maharashtra Weather Update)
हवामान विभागाने आज (२ मे) रोजी राज्यातील बहुतांश भागात उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.(Maharashtra Weather Update)
विशेषतः विदर्भात उष्णतेची तीव्रता अधिक असल्याने नागरिकांना २४ तास सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Maharashtra Weather Update)
कोकणात दमट उकाडा; 'हिट इंडेक्स'मुळे त्रास वाढणार
मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीत उष्णतेसोबतच दमट हवामान जाणवत आहे. हवेतील आर्द्रता ७० ते ८० टक्क्यांदरम्यान राहण्याची शक्यता असल्याने उकाडा अधिक तीव्र भासणार आहे.
कमाल तापमान ३३ ते ३७ अंश सेल्सिअसदरम्यान राहील. 'हिट इंडेक्स' जास्त असल्याने प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक उष्णता जाणवणार असून पावसाची कोणतीही शक्यता नाही.
मध्य महाराष्ट्रात तापमान ४० अंशांच्या उंबरठ्यावर
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रात उन्हाचा जोर कायम आहे. या भागांमध्ये कमाल तापमान ३७ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
हवामान पूर्णपणे कोरडे राहणार असून दुपारच्या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक जाणवेल. नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्रातही उन्हाचा चटका
नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांमध्येही तापमान ४० अंशांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे. वातावरण कोरडे राहणार असून ढगाळ वातावरण किंवा पावसाची शक्यता नाही. शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी वारंवार पाणी पिणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम
छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड आणि बीड या भागांत तापमान ३७ ते ४२ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी 'हिट वेव्ह'सदृश परिस्थिती कायम राहणार आहे. पुढील काही दिवसही उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.
विदर्भात सर्वाधिक तडाखा; नागपूरला यलो अलर्ट
नागपूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपूरमध्ये तापमान ४० ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. किमान तापमानही २४ ते २९ अंशांदरम्यान राहणार आहे.
नागपूरसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उष्माघाताचा धोका वाढल्याने वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी घराबाहेर पडणे टाळावे.
पुढील दिवसांत अवकाळी पावसाचे संकेत
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३ मेपासून विदर्भातील काही भागांत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी प्रतितास राहू शकतो. मात्र उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडेच राहण्याचा अंदाज आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
दुपारी ११ ते ४ या वेळेत उन्हात बाहेर पडणे टाळा
भरपूर पाणी प्या, शरीर हायड्रेट ठेवा
हलकी व सैल कपडे वापरा
उष्माघाताची लक्षणे (डोके गरगरणे, मळमळ) दिसल्यास त्वरित उपचार घ्या
वृद्ध व लहान मुलांची विशेष काळजी घ्या
राज्यात उष्णतेचा तडाखा कायम असून विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात परिस्थिती गंभीर आहे. पुढील काही दिवस नागरिकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.
अधिक वाचा : Super El Nino Alert : भारतावर 'हीट डोम' तयार झालाय; याचा नेमका अर्थ काय?
