Automatic Weather Stations : राज्यातील शेती व्यवस्थापन आणि आपत्ती पूर्वतयारी अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने स्वयंचलित हवामान केंद्रांच्या जाळ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. (Automatic Weather Stations)
१ एप्रिल २०२६ पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एकूण २,३३५ स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित झाली असून, ३४ जिल्ह्यांतील तब्बल ३५५ तालुक्यांपर्यंत हे जाळे विस्तारले आहे.(Automatic Weather Stations)
या तंत्रज्ञानाधारित प्रणालीमुळे हवामान निरीक्षण अधिक अचूक, वेगवान आणि 'रिअल-टाइम' झाले असून, कृषी क्षेत्रात मोठा बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत.(Automatic Weather Stations)
कोणते जिल्हे आघाडीवर?
हवामान केंद्रांच्या स्थापनेत अहिल्यानगर आणि पुणे हे जिल्हे अग्रस्थानी असून, दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १२९ केंद्रे कार्यान्वित आहेत. त्यानंतर नाशिक (१२०) आणि यवतमाळ (११०) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
विदर्भात यवतमाळ जिल्ह्याने सर्वाधिक केंद्रांसह आघाडी घेतली आहे, तर इतर जिल्ह्यांमध्येही केंद्रांची संख्या सातत्याने वाढविण्यात येत आहे.
शेतकऱ्यांसाठी कसे ठरणार फायदेशीर?
स्वयंचलित हवामान केंद्रांमुळे पाऊस, तापमान, वाऱ्याचा वेग, आर्द्रता यासारखी महत्त्वाची माहिती थेट आणि तत्काळ उपलब्ध होत आहे. यामुळे शेती निर्णय अधिक शास्त्रीय पद्धतीने घेणे शक्य होत आहे.
पीक विमा प्रक्रिया सुलभ : अचूक पावसाच्या नोंदींमुळे विमा दावे अधिक पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ होतात.
आपत्तीची पूर्वसूचना : अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ यांसारख्या संकटांची आगाऊ माहिती मिळाल्याने नुकसान कमी करता येते.
कृषी नियोजन सुधारणा : पेरणी, फवारणी, खत व्यवस्थापन आणि कापणीसाठी योग्य वेळ ठरवणे सोपे होते.
भौगोलिक गरजेनुसार नियोजन
राज्यातील विविध भागांतील भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमानातील चढ-उतार आणि पिकांचे प्रकार लक्षात घेऊन हवामान केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे.
पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात हवामान निरीक्षण अधिक मजबूत झाले असून, विविध पिकांच्या पट्ट्यानुसार केंद्रांची मांडणी करण्यात आली आहे. तसेच विदर्भात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर केंद्रांची संख्या वाढवून निरीक्षण अधिक सक्षम केले जात आहे.
'स्मार्ट शेती'कडे वाटचाल
राज्यातील २,३३५ स्वयंचलित हवामान केंद्रांचे विस्तृत जाळे हे 'स्मार्ट शेती'च्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. हवामानातील बदलांचा अचूक अंदाज घेऊन शाश्वत आणि तंत्रज्ञानाधारित शेती पद्धती विकसित करण्यासाठी ही प्रणाली मोठी मदत करणार आहे.
यामुळे भविष्यात हवामानावर आधारित निर्णय अधिक अचूक होऊन उत्पादनवाढ, नुकसान कमी करणे आणि शेती अधिक फायदेशीर बनवणे शक्य होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
