निशांत वानखेडे
सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वाढलेल्या तापमानाने नागरिक हैराण झाले असून, विदर्भात तर उष्णतेने उच्चांक गाठला आहे.(Super El Nino Alert)
नागपूर, अमरावती, वर्धा, अकोला या भागांत ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले आहे. अजून संपूर्ण मे महिना बाकी असल्याने पुढील काही आठवडे अधिकच कठीण जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. (Super El Nino Alert)
या भीषण उष्णतेमागे केवळ स्थानिक कारणे नसून जागतिक स्तरावरील हवामान बदल आणि विशेषतः 'एल निनो' (El Nino) चा तीव्र प्रकार 'सुपर एल-निनो' हे महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.(Super El Nino Alert)
राज्यभर तापमानाचा कहर
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत तापमान ४० अंशांच्या वर गेले असून, विदर्भात परिस्थिती अधिक गंभीर आहे.
अमरावती – ४६.६°C
वर्धा – ४६.५°C
अकोला – ४६.३°C
नागपूर – ४५°C
चंद्रपूर – ४५.२°C
जळगाव – ४४.६°C
परभणी – ४४.५°C
तर मुंबईसारख्या किनारी भागात तापमान तुलनेने कमी (३४.३°C) असले तरी उष्णतेसोबत आर्द्रतेमुळे नागरिक त्रस्त आहेत.
'हीट आयलँड' प्रभावामुळे उष्णतेत भर
हवामान तज्ज्ञ प्रा. अतुल देऊळगावकर यांच्या मते, वाढते कार्बन उत्सर्जन ही उष्णतेची प्रमुख कारणांपैकी एक आहे. १९९० मध्ये वातावरणातील कार्बनचे प्रमाण सुमारे ३५० ppm होते, ते आता ४३० ppm च्यावर गेले आहे.
समुद्रातील पाणी आणि कार्बन यांच्या अभिक्रियेमुळे कार्बोनिक ॲसिड तयार होते, ज्यामुळे समुद्राचे तापमान वाढते.
भारताच्या तिन्ही बाजूंनी समुद्र असल्याने, समुद्रातून येणारे उष्ण वारे आणि उत्तरेकडून येणारे कोरडे वारे यांचा मिलाफ होऊन देशावर 'हीट आयलँड'सारखा उष्णतेचा घुमट तयार होत आहे.
'सुपर एल-निनो' म्हणजे काय?
एल निनो हा प्रशांत महासागराशी संबंधित हवामानाचा एक महत्त्वाचा घटक आहे.
एल-निनोमध्ये समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढते
त्यामुळे कोरडे वारे भारताकडे वाहतात
भारतात तापमान वाढते आणि पावसाचे प्रमाण घटते
जेव्हा प्रशांत महासागराचे तापमान २ ते ३ अंशांनी वाढते, तेव्हा त्याला 'सुपर एल-निनो' म्हणतात. या स्थितीत उष्णतेची तीव्रता अत्यंत जास्त असते आणि पावसात मोठी घट दिसून येते.
याउलट 'ला निनो' वर्षांमध्ये भारतात पावसाचे प्रमाण वाढते. २०२५-२६ हे ला-निनो वर्ष होते, तर आता एल-निनोचा प्रभाव वाढत असल्याचे संकेत आहेत.
जागतिक परिणाम: भारतासह अनेक देश प्रभावित
'सुपर एल-निनो'चा प्रभाव केवळ भारतापुरता मर्यादित नसून इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आशियातील अनेक देशांवर होतो.
या काळात तापमान झपाट्याने वाढते
पावसाचे प्रमाण घटते
दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होते
१८७७-७८ चा भीषण इतिहास
इतिहासात १८७७-७८ हे वर्ष सुपर एल-निनोचे सर्वात भीषण उदाहरण मानले जाते.
ब्रिटिशकालीन भारतात तीव्र दुष्काळ पडला
अन्नटंचाई निर्माण झाली
लाखो लोकांचा मृत्यू झाला (भारतामध्ये अंदाजे ४ ते ५ लाख)
जागतिक स्तरावर सुमारे ४% लोकसंख्या घटल्याचे उल्लेख
यानंतर १९७२-७३, १९८२-८३, १९९७-९८ आणि २०१५-१६ या वर्षांतही 'सुपर एल-निनो'ची नोंद झाली, मात्र १८७७ इतकी तीव्रता पुन्हा दिसली नव्हती.
पुढील काळ अधिक कठीण?
सध्या विदर्भातील सहा जिल्ह्यांत पुढील २४ तास उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मे आणि जून महिन्यांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
वाढते कार्बन उत्सर्जन, समुद्राचे तापमान आणि 'सुपर एल-निनो' यांचा एकत्रित परिणाम म्हणून सध्याची उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे.
येत्या काही आठवड्यांत परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता असून, हवामान बदलाचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा स्पष्ट होत आहेत.
अधिक वाचा : Vidarbha Heatwave : विदर्भात उष्णतेचा कहर; पुढे पाऊस की आणखी उकाडा? वाचा सविस्तर
