Vidarbha Heatwave :एप्रिलच्या अखेरीस विदर्भात उन्हाचा प्रचंड तडाखा बसत असून, अनेक शहरांनी तापमानाचा ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. (Vidarbha Heatwave)
अकोला, अमरावती आणि वर्धा येथे शनिवारी तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले, तर नागपूरसह अनेक शहरांमध्ये पारा ४४ अंशांवर पोहोचला. उष्णतेच्या लाटेमुळे संपूर्ण विदर्भ अक्षरशः भट्टीसारखा तापला असून नागरिक हैराण झाले आहेत.(Vidarbha Heatwave)
'हॉट' दिवसाची नोंद
अमरावती येथे ४५.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले, जे यंदाच्या वर्षातील सर्वाधिक तापमान ठरले.
देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उष्ण शहर म्हणून अमरावतीची नोंद झाली आहे. अकोलामध्येही ४५.६ अंश, तर वर्ध्यात ४५ अंश तापमानाची नोंद झाली.
विदर्भ 'भट्टी' बनला
नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, ब्रह्मपुरी या भागांमध्ये तापमान ४३ ते ४४ अंशांच्या दरम्यान नोंदले गेले.
सकाळी १० वाजल्यापासूनच उष्णतेची तीव्रता जाणवत असून, दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत आहेत. उष्ण वाऱ्यामुळे नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले आहे.
काही प्रमुख शहरांचे तापमान (अंश सेल्सिअस)
अकोला – ४५.६°
अमरावती – ४५.६°
वर्धा – ४५.०°
नागपूर – ४४.२°
चंद्रपूर – ४४.२°
गोंदिया – ४३.६°
परभणी – ४२.७°
सोलापूर – ४२.०°
'ऑरेंज अलर्ट' जारी
हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून, नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाचाही इशारा
उष्णतेच्या तडाख्यानंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता असून, काही भागांत हलक्या पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
रात्रीही उष्णतेचा त्रास
रात्रीच्या तापमानातही वाढ होत असून, अमरावतीत किमान तापमान २४.३ अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
विदर्भात सध्या उष्णतेचा कहर सुरू असून पुढील दोन दिवस परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर संभाव्य पावसामुळे काहीसा दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
अधिक वाचा : Maharashtra Heatwave : सावधान! उन्हाचा पारा चढणार; मेमध्ये 'हिटव्हेव'चा इशारा
