Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनने (Monsoon) जोरदार एंट्री घेतली असून, आकाशात गडगडाट, जोरदार वारे आणि पावसाच्या सरी पुन्हा एकदा वातावरणात थंडी पसरवत आहेत. (Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि ४० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)
शेतकऱ्यांसाठी ही बाब महत्त्वाची असून, पेरणीपूर्व मशागतीपासून सुरक्षेच्या उपाययोजनांपर्यंत प्रत्येकाने हवामानाचा अंदाज घेऊनच पुढील पावले टाकावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update)
राज्यात यंदा मान्सूनने अपेक्षेपेक्षा लवकर हजेरी लावली असली तरी त्यानंतर काही काळ पावसाचा वेग मंदावला आहे. मात्र, आता पुन्हा एकदा राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस जोर धरु लागला आहे.
हवामान विभागाने कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणात मुसळधार पावसाची शक्यता
कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी विशेषत: यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, येथे मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या गडगडाटासह वारे
पुणे, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांत ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे. या भागातील नागरिकांनी विशेषतः उघड्यावर फिरणे, जलस्रोताजवळ जाणे किंवा विजांच्या वेळी झाडांखाली थांबणे टाळावे.
मराठवाड्यात यलो अलर्ट
मराठवाड्यातील बहुतांश भागांत पावसाचे वातावरण सक्रिय आहे. फक्त धाराशिव आणि लातूर वगळता इतर सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आगामी शेती कामांसाठी योग्य नियोजन करावे.
विदर्भातही पावसाचा जोर
बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठीही हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या भागातही विजांसह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील आठवड्यात मान्सूनचा जोर वाढण्याची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, १२ जून नंतर राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढणार आहे. मान्सून सध्या उत्तरेकडे सरकत असून, लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात शेतीसाठी पोषक वातावरण तयार होईल, असा अंदाज आहे.
यलो अलर्ट असलेले जिल्हे
कोकण: रायगड, रत्नागिरी
पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सोलापूर, सातारा
मराठवाडा: (धाराशिव, लातूर वगळता) उर्वरित सर्व जिल्हे
विदर्भ: बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली
शेतकऱ्यांना सल्ला
* हवामानातील बदल लक्षात घेता शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची तयारी करावी.
*हवमानाचा अंदाज घेऊन पुढील नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.