पारनेर : कुकडी डावा कालव्याला गुरुवारी (दि. ५) सकाळी १० वाजता ५०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले.
येडगाव धरणातून हा विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी तान्हाजी खाडे यांनी दिली. रब्बी हंगामातील पिकांसह उन्हाळी पिकांना आवर्तनाचा फायदा होणार आहे.
कुकडी डावा कालव्याला पाणी सोडल्याने फळबागांसह कांदा, ऊस, घास, कडवाळ, मका, हिरवा चारा या पिकांना जीवदान मिळणार आहे. मागील १५ दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली होती.
या भागात शेतकऱ्यांनी तातडीने पाणी सोडण्याची मागणी आमदार काशीनाथ दाते यांच्याकडे केली होती. दाते यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन कुकडी कालवा व पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी लवकर सोडण्याची मागणी केली.
मात्र, कुकडी डावा कालव्याचे पाणी नगरसह सोलापूर जिल्ह्याला मिळत असल्याने हे पाणी १० ते १५ मार्चपर्यंत सोडण्याची मागणी इतर आमदारांनी केली.
या सर्वांचा समन्वय साधत हे पाणी ५ मार्चला सोडण्याची सूचना विखे पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार हे आवर्तन सोडण्यात आले आहे.
अधिक वाचा: ऊस काटा मारीवर अंकुश ठेवण्यासाठी अखेर शासनाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय; वाचा सविस्तर
