टेंभुर्णी : उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड येथील विसर्गात घट झाली असून ११ हजार ९१२ क्युसेक विसर्ग उजनी धरणात सुरू आहे. सध्या उजनी धरणाचीपाणी पातळी दिवसभरात वाढून ४६ टक्के झाली.
गेल्या दोन दिवसांत उजनी पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने दौंड येथील विसर्गात वाढ झाली होती. १६ हजार क्युसेकपर्यंत दौंड विसर्ग गेला होता. रविवारी सकाळी १४ हजार ४०२ क्युसेक होता.
दिवसभरात २ हजार क्युसेक विसर्ग कमी झाला आहे. सध्या उजनी धरणात एकूण ८८.३२ टीएमसी पाणीसाठा असून २४. ६७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
गतवर्षी उजनी धरणात वजा ४८.९८ टक्के पाणीसाठा होता. तर ३७.८२ टीएमसी पाणीसाठा होता. गतवर्षीचा तुलनेत ५० टीएमसी अधिक पाणी साठा आहे.
गेल्या २४ मेपासून दौंड येथील विसर्ग कायम असून असाच विसर्ग कायम राहिल्यास उजनी धरणाची पाणी पातळी लवकरच ५० टक्के होणार असून त्यानंतर उजनी शंभरीकडे वाटचाल करणार आहे.
या वर्षी उजनी धरण शंभर टक्के भरणार असल्याने पुढील वर्षी ऊस केळी या नगदी पिकांना फायदा होणार आहे.
दहिगाव उपसा सिंचन योजना, सीना माढा उपसा सिंचन योजना व उजनी डावा व उजव्या कळव्यावरील शेतीसाठी फायद्याचे ठरणार आहे.
या भागातील पिके उजनी पाणी पातळी खाली गेल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात जून, जुलै महिन्यात जाळून जातात. उजनी समांतर जलवाहिनी चालू झाल्याने पुढील वर्षी जून अखेरपर्यंत शेतीला पाणी मिळणार आहे.
अधिक वाचा: दमदार पावसानंतर नगर जिल्ह्यातील धरण पाणीसाठ्यात दुपटीने वाढ; कोणत्या धरणात किती पाणी?