टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरण मेअखेरीस वजा २२ टक्के वरती पोहोचले असून, पुढील आठ दिवसात वजा ३० टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
सध्या उजनी मुख्य कालव्यातून १ हजार ७४९ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. सोलापूर उजनी समांतर नवीन जलवाहिनी सुरू होणार असल्याने तीन पाळ्यातून भीमा नदीत १८ ते २० टीएमसी पाणी सोडावे लागत होते. कधी कधी २२ टीएमसी पाणी सोडावे लागत होते.
या जलवाहिनीला ३ टीएमसी पाणी लागणार आहे. यामुळे १२ टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. पुढील वर्षापासून जून-जुलैपर्यंत शेतीला पाणी मिळू शकेल, असा अंदाज उजनी धरण वरिष्ठ अभियंता रावसाहेब मोरे यांनी व्यक्त केला.
गतवर्षी ९ जून २४ पासून दौंड येथून विसर्ग सुरू झाला होता. पावसाळा लवकर सुरू झाल्याने उजनी पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मोसमी पावसामुळे उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली होती.
यावर्षीदेखील हवामान विभागाने मान्सून लवकर दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवल्याने पाऊस सुरू झाल्यानंतरच उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास उजनीची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.
औज बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता ०.२५ टीएमसी आहे. परंतु, हा बंधारा भरून घेण्यासाठी उजनीतून भीमा नदीत चार टीएमसी पाणी सोडले जाते. आता औजमधून फारसा पाणी उपसा करण्याची गरज भासणार नाही.
गतवर्षी ९ जून २४ पासून दौंड येथून उजनी धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली होती, तर २६ जुलै रोजी मृत साठ्यातून बाहेर आले होते. त्या दीड महिन्यात ३२ टीएमसीने पाणीसाठा वाढला होता.
५ ऑगस्ट २४ रोजी उजनी शंभर टक्के भरले होते. गतवर्षी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने २३ टीएमसी अतिरिक्त पाणी उजनी धरणातून सोडून द्यावे लागले होते.
अशी होईल चाचणी
उजनीच्या नव्या पंपगृहातील ११५० अश्वशक्तीच्या चार पंपातून पाणी उपसा सुरू होईल. हे पाणी प्रथम वरवडे टोलनाक्याजवळील ब्रेक प्रेशर टँकमध्ये येईल. या टँकची चाचणी यशस्वी होताच पुन्हा पाणी उपसा सुरू होईल.
शेतीसाठी पाणी मिळणार
- १२३ टीएमसी क्षमता असलेले उजनी ११७ टीएमसीला शंभर टक्के भरते, तर ६३.६६ टीएमसी राज्यातील सर्वाधिक मृत साठ्यातील धरण म्हणून ओळखले जाते.
- सध्या उजनी धरणात ५१.८३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
- सध्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी भीमा खोऱ्यातील कधी पाऊस पडतो याकडे लक्ष आहे.
- पुढील काळात उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर शेतीला पाणी मिळणार असून, यासाठी पुढील तीन-चार महिने वाट पाहावी लागणार आहे.
पुढील काळात उजनीतून भीमा नदीत केवळ आषाढी वारीला पाणी सोडण्यात येईल, कारण भीमा नदीत किती टीएमसी पाणी सोडावे अशी तरतूद नाही. मधल्या काळात भीमा नदीत पाणी सोडायचा निर्णय कालवा सल्लागार समिती घेईल. - रावसाहेब मोरे, वरिष्ठ अभियंता उजनी धरण, भीमानगर
अधिक वाचा: ८४ लाख रुपये खर्चुन ब्रिटिशांनी बांधलेल्या ह्या धरणाला पूर्ण होणार १०० वर्ष; जाणून घ्या इतिहास