रत्नागिरी : 'कोकणचं पांढरं सोनं' म्हणून ओळखणारे काजू पीकही या वर्षी नैसर्गिक संकटात सापडले आहे. या वर्षी मोहर मोठ्या प्रमाणात आला असला, तरी अतिथंडीमुळे मोहर करपून गेला.
त्यामुळे जेमतेम ५० ते ६० टक्के एवढेच पीक आले आहे. मात्र, उत्पादन कमी असले, तरी सुरुवातीपासून काजूला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दराने तारले आहे.
आंबा हंगामाने आर्थिक गणित विस्कटले असले, तरी काजू दराने बागायतदारांना काहीसे तारले आहे. गेली काही वर्षे आंबापिकाप्रमाणे काजू पिकालाही नैसर्गिक दृष्टचक्राचा सामना करावा लागत आहे.
या वर्षी मोहर चांगला आला. त्यामुळे उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, कडाक्याच्या थंडीमुळे आंब्याप्रमाणे काजूचाही मोहर करपला.
कीटकनाशकांची फवारणी करूनही अपेक्षित परिणाम दिसला नाही परिणामी, कमी उत्पादनाचा फटका पिकाला बसला आहे. या वर्षी आंबा पिकामुळे बागायतदारांची आर्थिक घडी विस्कटली आहे.
उत्पादन कमी त्यातच दरही काहीसा कमी मिळाल्याने आंबा हंगाम निराशादायक ठरला आहे. त्यामुळे बागायतदारांची काजू पिकावर भिस्त होती.
या वर्षी काजूचे उत्पादन कमी आल्याने बागायतदार चिंतेत होते, पण सुरुवातीपासूनच काजूला चांगला दर मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.
ओल्या काजूगराला चांगला दर
◼️ जानेवारीपासूनच ओले काजूगर बाजारात यायला सुरुवात होते.
◼️ सुरुवातीला १,२०० ते १,३०० रुपये किलो दर होता.
◼️ आवक वाढल्यानंतर दरात घट झाली. आता आवकही कमी व दरही कमी आहे.
◼️ सध्या १,००० रुपये किलो काजू बी विक्री सुरू आहे.
काजूबीलाही चांगला दर
◼️ या वर्षी ओल्या काजूगराप्रमाणे सुक्या काजू बीलाही चांगला दर मिळाला.
◼️ वेंगुर्ला ६, ७ या वाणाच्या बीसाठी १६५ ते १७५ रुपये किलोला दर मिळाला.
◼️ गावठी काजूला १५० ते १५५ रुपये दर मिळाला.
◼️ सुरुवातीपासून आतापर्यंत दर तोच आहे.
◼️ दर टिकून राहिल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.
आकडेवारी
◼️ काजू लागवड क्षेत्र (हेक्टर) - १,११,६२५
◼️ उत्पादनक्षम क्षेत्र (हेक्टर) - ९४,६८०
◼️ दरवर्षी उत्पादन (मेट्रिक टन) - १,४२,०२०
◼️ मे.टन (हेक्टरी) उत्पादन क्षमता - १.५०
यावर्षी फुलोरा ज्या प्रमाणात आला होता, ते पाहून काजू हंगाम बंपर होईल, असेच वाटले होते. मात्र, हवामानातील बदलाचा परिणाम पिकावर झाला. मोहर अति थंडीमुळे करपून गेला. कीटकनाशकांची फवारणी करूनही अपेक्षित पीक मिळालेले नाही. पीक कमी आहे, परंतु दर सुरुवातीपासून टिकून राहिल्याचे समाधान आहे. किमान पिकासाठी केलेला खर्च तरी वाया जाणार नाही. - रमेश शितप, करबुडे
अधिक वाचा: बदललेल्या शक्तीपीठ महामार्गामुळे 'या' ३४ गावांतील जमिनीच्या किमतीत दुपटीने वाढ; एकरी काय दर?
