अतुल क्षीरसागर
रावेत : यंदा रोगाच्या प्रादुर्भावामुळे तांदळाचे उत्पादन घटले. त्यामुळे ग्राहकांना तांदूळ खरेदीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.
मागील वर्षी ४५ रुपये किलोने विक्री होणारा इंद्रायणी तांदूळ आता बाजारात ६० रुपये किलोने विक्री होत आहे. यंदा तांदळाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे तांदळाच्या किमतीही वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतील तांदूळ राज्यातील बाजारपेठेत येतो. सध्या बाजारपेठेत कोलम, बासमती, दिल्ली राईस, इंद्रायणी आदी तांदूळ विक्री होतात.
पिंपरी-चिंचवड बाजारात इंद्रायणी तांदळाला अधिक मागणी आहे. तांदळाचे उत्पादन कमी झाले असल्याने सध्या तांदळाच्या दरात काही प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रामध्ये तांदूळ अधिक खाल्ला जातो. त्यात मावळला भाताचे कोठार असेही म्हटले जाते. मावळ तालुक्यात इंद्रायणी भाताचे मोठे उत्पादन होते. त्यामुळे मावळातून इंद्रायणी तांदळाची विक्रीही मोठ्या प्रमाणात होते.
अनेक शेतकरी व्यापाऱ्यांकडे तांदळाची विक्री न करता तांदूळ थेट ग्राहकांना विकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनाही तांदळाला चांगला भाव मिळतो.
भाव आणखी वाढणार
सध्या बाजारपेठेत तांदळाच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे सामान्यांना भुर्दंड बसत आहे. शहरात तांदूळ खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. मागणी वाढत असल्याने तांदळाचे भाव प्रत्येक महिन्याला काही प्रमाणात वाढत असल्याचे चित्र आहे.
आवड इंद्रायणी, बासमती आणि कोलमचीही
प्रत्येक कुटुंबामध्येच वरण, भाजी, भाकरीसोबत आहारात भाताचा समावेश केला जातो. अनेकजण तर जेवणामध्ये भात नसेल, तर जेवण होत नसल्याचे सांगतात. त्यामुळे थोडा का होईना मात्र, आहारात भाताचा समावेश असतोच. त्यामध्येही 'इंद्रायणी', 'बासमती' व 'कोलम' खाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. हॉटेल आणि खानावळीत इंद्रायणी तांदळाच्या भाताला पसंती दिली जाते.
दहा टक्क्यांनी वाढले भाव
मागील वर्षी असणाऱ्या इंद्रायणी तांदळाच्या दरासह इतर प्रकारच्या तांदळाच्या दरात यावर्षी १० टक्के वाढ झाली आहे. दिवसेंदिवस शहरात इंद्रायणी तांदळाची मागणी वाढत आहे.
आपल्याकडे केवळ इंद्रायणी तांदळाचे उत्पादन घेतले जाते. आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांतून मोठ्या प्रमाणात इतर प्रकारचा तांदूळ आयात केला जातो. नवीन मालाची आवक सुरू झाली आहे. लग्नसराई असल्याने तांदळाचे दर काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. इंद्रायणी, बासमती तांदळाला ग्राहकांची अधिक पसंती आहे. - रामराजे बेंबडे, व्यापारी, बिजलीनगर