सांगली : इराण, इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे जिल्ह्यातून आखाती देशातील केळी, द्राक्ष, कांदा, साखर निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे.
केळी उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक मोठा फटका बसला असून चार दिवसांत प्रति क्विंटल एक हजार रुपयांनी दर उतरल्याचे निर्यातदारांनी सांगितले.
रमजानचा महिना सुरू असल्याने आखाती देशात केळीसह इतरही फळांना मोठी मागणी असून युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात थांबली आहे. दरम्यान, युरोप, साउथ एशिया देशांत जिल्ह्यातून ४५० कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली आहे.
इराण, इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे जिल्ह्यातून निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. रमजानचा महिना सुरू असल्याने आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर केळी, डाळिंब, द्राक्ष जिल्ह्यातून निर्यात होती.
एकीकडे केळीची निर्यात ठप्प झाली असून दुसरीकडे केळीच्या दरात देखील मोठी घट झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
युद्धापूर्वी केळीचा दर मागील आठवड्यात प्रतिक्विंटल दोन हजार ५०० रुपये दर होता. मात्र, त्यात आता क्विंटलला हजार रुपयांची घट झाल्याने केवळ एक हजार ५०० रुपये दर मिळत आहे.
केळी निर्यातीमध्ये जळगाव, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यानंतर सांगली जिल्ह्याचा क्रमांक लागतो. महिन्याला २० ते २५ कंटेनर केळी दुबई, अबुधाबी, सौदी अरेबिया, बहरीन, कुवेत, कतार, संयुक्त अरब अमिराती, ओमान, इराक आणि इराण देशाला जात होते.
पण, गेल्या चार दिवसापासून आखाती देशात युद्ध सुरू झाल्यामुळे केळीचे दर कमी झाले आहेत. आखाती देशातील युद्धाचा साखर, कांदा, द्राक्ष उत्पादकांनाही मोठा फटका बसणार आहे. आखाती देशात निर्यात होणारी साखरही ठप्प झाल्याचे साखर कारखानदारांनी सांगितले.
युद्धामुळे केळी, कांदा, साखर निर्यात थांबली असली तरी यूरोप, साउथ एशिया देशांत द्राक्ष निर्यात सुरू आहे. या देशात दि. १ एप्रिल २०२५ ते दि. २ मार्च २०२६ अखेरपर्यंत ४५० कंटेनरमधून सात हजार २२२ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.
निर्यात द्राक्षाला युरोप देशांमध्ये प्रतिकिलो १०० ते १५० रुपयेपर्यंत दर मिळत असल्याचे निर्यातदारांनी सांगितले.
युरोपात द्राक्षांना चांगला दर
◼️ द्राक्षबागायतदार संघाचे विभागीय उपाध्यक्ष मारुती चव्हाण म्हणाले, आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे दुबई, अबुधाबी, सौदी अरेबिया, बहरीन देशाला होणारी द्राक्ष निर्यात थांबली आहे. पण, युरोप, साउथ एशिया देशातील द्राक्ष निर्यात सुरळीत चालू आहे.
◼️ या ठिकाणी काळी कृष्णा, ज्योतीला प्रति किलो १२५ ते १५० रुपये दर मिळत आहे. हिरव्या द्राक्षांना २० ते १२० रुपये किलो दर मिळत आहे. देशांतर्गतही द्राक्षांना चांगली मागणी असल्यामुळे ९० ते १०० रुपये दर मिळत आहे.
अधिक वाचा: मनाप्रमाणे जास्त क्षमतेचा सोलार प्रकल्प बसविण्याचा मार्ग झाला बंद; आता 'हा' नवा नियम लागू
