कमी कालावधीत उत्पादन देणारे आणि जलद नफा मिळवून देणारे पीक म्हणून कोथिंबीर (धना) पिकाकडे शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
जुन्नर तालुक्यात पारंपरिक पिकांच्या तुलनेत अल्पावधीत उत्पन्न मिळत असल्याने आणि सध्या बाजारात चांगले दर मिळत असल्यामुळे अनेक शेतकरी कोथिंबीर लागवडीकडे वळत आहेत.
विशेषतः नारायणगाव येथील बाजार समितीत कोथिंबीरीला ५०१ ते ४,४०० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत आणि मुंबईच्या बाजारपेठेतही समाधानकारक भाव मिळत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या अनेक शेतकरी हिरव्या कोथिंबीर उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत.
बाजारातील वाढती मागणी आणि चांगले दर यामुळे हे पीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असल्याचे शेतकरी सांगतात.
काही प्रगतशील शेतकऱ्यांनी कमी कालावधीत लाखो रुपयांचे उत्पन्न घेतल्याची उदाहरणेही समोर येत आहेत.
मात्र, वाढते तापमान हे कोथिंबीर पिकासाठी मोठे आव्हान ठरत आहे. सध्याच्या उष्ण हवामानामुळे पिकांची उगवण नीट होत नाही, तसेच रोपांची वाढही अपेक्षित प्रमाणात होत नाही.
हवामानातील बदलांतही फायदेशीर पर्याय
◼️ काही प्रगतशील शेतकरी शेती मशागत करून योग्य नियोजन, पाटपाणी, स्प्रिंकलर सिंचन, तसेच सुधारित बियाण्यांचा वापर करून चांगले उत्पादन घेत आहेत.
◼️ भांडवली खर्च तुलनेने जास्त असला तरी योग्य व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील योग्य वेळ साधल्यास चांगले उत्पन्न मिळत असल्याचे ते सांगतात. कोथिंबीर हे पीक साधारण ३२ ते ३६ दिवसांत तयार होते.
◼️ बाजारभाव चांगला मिळाला, तर चांगले उत्पन्न मिळते; मात्र सध्याच्या उष्णतेमुळे उगवणीत अडचणी येत आहेत असे एका शेतकऱ्याने सांगितले.
◼️ एकंदरीत, हवामानातील बदलांमुळे काही अडचणी निर्माण होत असल्या तरी बाजारभावाचा आधार, जलद उत्पादन आणि वाढती मागणी यामुळे कोथिंबीर पीक शेतकऱ्यांसाठी आकर्षक आणि फायदेशीर पर्याय ठरत आहे.
अधिक वाचा: पावसाचे निसर्ग संकेत; वाचा निसर्गातील कोणकोणते सजीव कसे देतात पाऊस येण्याचे संकेत?
