विश्वास पाटील
कोल्हापूर : राज्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत दोन कोटी टनांनी गाळप आणि साखरेचे उत्पादनही २० लाख टनांनी वाढले आहे.
गतवर्षी याच तारखेला सात कोटी गाळप आणि ६४ लाख टन साखर उत्पादन झाले होते यंदा ते ९ कोटी टन गाळप आणि ८५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.
साखर आयुक्तालयाने यंदा ११ कोटी टन गाळपाचा अंदाज केला असला तरी त्यात ५० लाख टनांची घट होण्याची शक्यता आहे.
यंदा हंगाम वेळेत सुरू झाल्याने पहिल्या शंभर दिवसांत हंगाम जोरात सुरू राहिल्याने गाळप वाढल्याचे दिसत आहे. राज्यातील अजून एकही कारखाना बंद झालेला नाही.
यंदाच्या हंगामात सहकारी १०२ व खासगी १०५ कारखाने सुरू आहेत. कोल्हापूर विभागातील कारखान्यांचे गाळप संपत आले असून, दि. २० फेब्रुवारीपासून कारखाने बंद होतील.
पुणे आणि मराठवाड्यातील कारखाने मार्चपर्यंत चालतील असा अंदाज आहे. मराठवाड्यात ५५ कारखाने सुरू आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात हंगाम दि. १ नोव्हेंबरला सुरू झाला. तिकडे तो दि. १५ नोव्हेंबरनंतर सुरू झाल्याने तेथील कारखाने जास्त दिवस चालतील असे दिसते.
राज्यातील ९ फेब्रुवारीपर्यंत झालेले गाळप अहवाल
| विभाग | एकूण कारखाने | ऊस गाळप (लाख टन) | साखर उत्पादन (लाख क्विंटल) |
|---|---|---|---|
| कोल्हापूर | ३७ | १९४.२ | २११.१९ |
| पुणे | ३२ | २०२.६ | १९५.४३ |
| सोलापूर | ४९ | १९७.६ | १६६.९४ |
| अहिल्यानगर | २७ | ११४ | १०१.५ |
| छ. संभाजीनगर | २५ | ९०.४१ | ७१.७१ |
| नांदेड | ३० | १०१.६ | ९३.३७ |
| अमरावती | ०४ | १०.२ | ९.३१ |
| नागपूर | ०३ | १.५९ | ०.७१ |
| एकूण | १९९ | ९१२.२ | ८५०.१६ |
थोडक्यात
◼️ सर्वाधिक कारखाने - सोलापूर (४९)
◼️ सर्वाधिक ऊस गाळप - पुणे (२०२.६ लाख टन)
◼️ सर्वाधिक साखर उत्पादन - कोल्हापूर (२११.१९ लाख क्विंटल)
◼️ विदर्भ विभागात (अमरावती, नागपूर) उत्पादन तुलनेने कमी आहे.
साखर आयुक्तालयाने यंदा ११ कोटी टन गाळपाचा अंदाज बांधला होता; परंतु सततचा पाऊस, पुरेसे ऊन मिळाले नाही, मशागतीला आलेल्या अडचणी यामुळे एकरी उत्पादन घटले. त्याचा परिणाम म्हणून ५० लाख टन गाळप कमी होईल, असा अंदाज आहे. - विजय औताडे, साखर उद्योगाचे अभ्यासक
अधिक वाचा: रेशन दुकानातून गव्हासोबत मिळणार आता मका; कोणत्या लाभार्थ्यांना किती किलो मका मिळणार?
