राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते.
अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते.
त्यानुषंगाने अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन २०२५-२६ साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आल्या असून त्याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
या स्पर्धेअंतर्गत खरीप (११) व रब्बी (०५) हंगामातील एकूण १६ पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार असून, तालुका, जिल्हा व राज्य या तीन स्तरांवर स्पर्धकांची निवड होणार आहे.
पिकस्पर्धेतील पिके
खरीप
भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल (एकूण ११ पिके)
रब्बी
ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस (एकूण ०५ पिके)
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
खरीप हंगाम
मूग व उडीद पिक: ३१ जुलै २०२५
भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल: ३१ ऑगस्ट २०२५
रब्बी हंगाम
ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस: ३१ डिसेंबर २०२५
बक्षिसाचे स्वरूप (सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये)
स्पर्धा पातळी | पहिले | दुसरे | दुसरे |
तालुका पातळी | ५,००० | ३,००० | २,००० |
जिल्हा पातळी | १०,००० | ७,००० | ५,००० |
राज्य पातळी | ५०,००० | ४०,००० | ३०,००० |
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
१) विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)
२) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन.
३) ७/१२, ८-अ चा उतारा.
४) जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास)
५) पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा.
पिकस्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी बंधु-भगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संकेतस्थळला भेट द्यावी.
अधिक वाचा: रानभाज्यांमध्ये सर्वात महागडी आणि चविष्ट असणारी 'ही' भाजी बाजारात दाखल