किल्ले विजयदुर्गचे काम लवकरच सुरू करणार, दिल्लीतून परवानग्या घेतल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 03:35 PM2020-08-10T15:35:57+5:302020-08-10T16:01:34+5:30

मराठा आरमाराची विजयी गाथा सांगणारा पूर्वीचा ‘घेरिया’ आणि आताचा ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला म्हणजे कोकण किनारपट्टीवरील शान!

इंग्रजांनाही या किल्ल्याची एवढी आस होती की, केवळ फितुरीमुळे पेशव्यांच्या मदतीने आंग्रेंचा पाडाव करून हा किल्ला जिंकल्यावर पेशव्यांबरोबर झालेल्या तहानुसार विजयदुर्ग किल्ल्याच्या बदली बाणकोट जवळची दहा गावे द्यायला इंग्रज तयार झाले होते.

नावाप्रमाणेच विजयी झेंडा फडकवणारा विजयदुर्ग म्हणजे जलदुर्गाचा बादशहाच जणू! इंग्रज, पोतुगीज, डच इ. परकीय शत्रूंच्या तोफांचा महाभयंकर मारा खाऊनही आपल्या वास्तूचा एकही दगड ज्या किल्ल्याने जागचा हालू दिला नाही, असा मिश्रदुर्ग म्हणजेच विजयी विजयदुर्ग!…

छत्रपतींनी हा किल्ला जिंकण्याअगोदर तो ५ एकरात वसलेला होता. पण महाराजांनी किल्ल्या ताब्यात घेतल्यावर किल्ल्याच्या सभोवती चिलखती तटबंदी उभारली आणि किल्ल्याचे क्षेत्रफळ १७ एकर १९ गुंठे झाले.

प्रत्येक ठिकाणचे एक वेगळे महात्म्य असते, तसेच विजयदुर्ग या किल्ल्याचेही आहे. इतिहासातील कित्येक लढायांचा हा किल्ला साक्षीदार आहे.

या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे यावर असलेल्या अनेक वास्तू आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. त्यामुळेच, या वास्तूंचं जतन व संवर्धन करणं गरजेचं आहे.

विजयदुर्ग किल्ला शासनाने रायगड विकास प्राधीकरणांतर्गत दिल्यास, या किल्ल्याची जवळपास 80 टक्के पुनर्बांधणी करुन घेता येईल, असे खासदार संभाजीराजेंनी म्हटलंय.

समुद्रात असलेल्या अनेक किल्ल्यांपैकी हा एकमेव असा आहे, ज्याच्या भिंती आजही तटावर भक्कमपणे उभ्या आहेत. त्यामुळे पुनर्बांधणीची संधी रायगड विकास प्राधीकरणाला मिळावी, अशी इच्छा संभाजीराजेंनी व्यक्त केलीय.

राज्य सरकार असो वा केंद्र सरकार, केवळ मुंबई व दिल्लीतील वातानुकूलित कार्यालयात बसून, पत्र लिहून किल्ल्यांचे संवर्धन होणार नाही. किल्ल्यांवर प्रत्यक्ष जाऊन, पाहणी करुन, बारकाईने अभ्यास करुनच आपण आपला सांस्कृतिक ठेवा पुढच्या पिढीला बघण्यासाठी जपून ठेऊया, असे संभाजीराजेंनी म्हटलंय.

मराठा आरामाराचे प्रमुख केंद्र असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पुनर्बांधणी करून घेतलेला विजयदुर्ग आज अस्तित्वासाठी झगडतोय. खासदार संभाजीराजे भोसले यांनी पाहणीसाठी विजयदुर्ग किल्ल्यास भेट दिली. त्यावेळी, याआधी दोनदा दिल्लीत जाऊन सर्व त्या परवानग्या घेतल्या असून लवकरात लवकर किल्ले विजयदुर्गाचे काम सुरू होईल, असे संभाजीराजेंनी सांगितले.