शरद पवार यांच्यावर चंद्रकांत पाटील यांचे '' सायकॉलॉजिकल स्ट्राईक ''

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 07:41 PM2019-04-03T19:41:54+5:302019-04-03T19:47:08+5:30

बारामती, माढ्यापासून शरद पवार यांचे राजकारणच संपविण्याची वक्तव्ये करून राष्ट्रवादी कॉँग्रेसला खच्ची करण्याचे धोरण चंद्रकांत पाटील यांनी आखले असल्याचे दिसून येत आहे. 

Chandrakant Patil's "sycological Strike" on Sharad Pawar | शरद पवार यांच्यावर चंद्रकांत पाटील यांचे '' सायकॉलॉजिकल स्ट्राईक ''

शरद पवार यांच्यावर चंद्रकांत पाटील यांचे '' सायकॉलॉजिकल स्ट्राईक ''

Next
ठळक मुद्देपश्चिम महाराष्ट्रातील रणनिती : माढ्यातील माघारीवरून लक्ष्य, बारामतीबाबत इशारे 

- अविनाश थोरात 
पुणे : प्रतिपक्षावर सतत हल्ले करून मानसिक खच्चीकरण करायचेच; परंतु त्याबरोबरच त्याच्या समर्थकांनाही संभ्रमित करण्याची कल्पना मानसशास्त्रीय युध्दात वापरली जाते. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्याविरोधात हीच रणनिती आखली आहे. बारामती, माढ्यापासून शरद पवार यांचे राजकारणच संपविण्याची वक्तव्ये करून राष्ट्रवादी कॉँग्रेसला खच्ची करण्याचे धोरण चंद्रकांत पाटील यांनी आखले असल्याचे दिसून येत आहे. 
शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे सूचित केले आणि पाटील यांनी त्यांच्याविरुध्द आघाडी उघडली. पवार यांचा पराभव करू अशी वक्तव्ये करायला सुरूवात केली. शरद पवारांनी या वयात लोकसभा लढवू नये. लोकसभा मतदारसंघात ६०० गावे येतात.  एवढ्या मोठ्या परिसरात त्यांनी या वयात फिरणं अवघड आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभा न लढवलेलीच बरी. पण लढलेच तर भारतीय जनता पक्ष त्यांचा पराभव करेल. असे पाटील म्हणाले. शरद पवार यांचा कार्यकर्त्यांच्या बद्दलचा कॉन्फिडन्स गेल्याने ते स्वत: माढा लोकसभा मतदारसंघांतून उभे  राहत आहेत, अशी टीकाही पाटील यांनी केली. 
राष्ट्रवादी  कॉंग्रेसमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे शरद पवार यांनी माढ्यातून निवडणू न लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाटील यांच्या पवार यांच्याविरुध्दच्या टीकेला आणखी धार आली. शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली, अशी वक्तव्ये आता ते प्रत्येक सभेत करत आहेत. 
राष्ट्रवादी  कॉँग्रेसने गेल्या निवडणुकीत कोल्हापूर, सातारा, माढा आणि बारामती या चार जागा जिंकल्या होत्या. या चारही जागा पश्चिम महाराष्ट्रात येतात आणि त्याची जबाबदारी पाटील यांनी घेतली आहे. त्याबाबतही त्यांनी टीका करायला सुरूवात केली आहे. शरद पवार हे चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करतात. महाराष्ट्रातल्या या चार जागा गमावल्यास पवारांना दिल्लीत राहता सुद्धा येणार नाही. त्यांना दिल्लीत घर शोधावे लागेल.अशी टीका पाटील यांनी सुरू केली आहे.  
पवार यांच्या माढ्यातून न लढण्याच्या निर्णयाचे कारणही निवडणुकांमध्ये येत असलेले अपयश, जातियतेचे न जमणारे गणित यामुळे शरद पवार यांना नैराश्य आले आहे,  असे ते म्हणत आहेत.  शरद पवार यांच्या पुरोगामी भूमिकेबाबतही संशय निर्माण करणारी टीका पाटील यांच्याकडून सुरू आहे. शरद पवार हे खूप जातीय द्वेषी आहेत. त्यांच्या सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही? ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्या नावाने बोंब मारली जाते त्या ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. असेही ते म्हणाले.  आम्ही ज्या वेळी छत्रपती संभाजी महाराजांना राज्यसभेवर घेतले तेव्हा शरद पवार म्हणाले होते, आता पेशवे राजे नेमू लागले आहेत. त्यांच्या विधानातून त्यांचा जातीय द्वेष स्पष्ट झाला आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे.
 केंद्रीय राजकारणात सतत लुडबुड करणाºया राष्ट्रवादी काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला उद्ध्वस्त करून शरद पवार यांचे राजकारण संपविणार, असल्याचे पाटील म्हणत आहेत. पाटील यांनी बारामती मतदारसंघातील सहाही मतदारसंघात सहा दिवस मुक्काम करण्याचे जाहीर केले आहे. पश्चिम  महाराष्ट्रातील लोकसभेच्या दहाही जागा जिंकायच्या आहेत. त्याची सुरूवात पुणे आणि बारामतीपासून होणार आहे,  असे म्हणत बारामतीत वादीचा पराभव करणारच असे सांगायला सुरूवात केली आहे. पवार कुटुंबातील गृहकलहाबाबतही पाटील बोलत आहे.  पवारांना नातवाला खासदार बनवायचं होतं तर त्याला बारामतीमधून उभा करायचं होतं. मात्र स्वत:च्या मुलीसाठी त्यांनी तसे केले नाही. शेवटी पार्थला मावळमध्ये ढकलण्यात आलं. नातू पार्थ पवारपेक्षा शरद पवारांना आपल्या पोरीवर जास्त प्रेम आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे. अजित पवार यांनाही पाटील यांनी लक्ष्य केले आहे. अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार आहे. ही केस कोर्टात असून कधीही निकाली येऊ शकतो, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.  ज्यांना आयुष्यात कधीच संधी मिळाली नाही, ते लोक आता सकाळ-दुपार-संध्याकाळ संधी घेत आहेत, त्यांनी विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान दिले आहे. 
अजित पवार यांनीही चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.  आयुष्यात कधीही खासदारकी लढले नसलेले मंत्री चंद्रकांत पाटील  आम्हांला सल्ले देऊ लागले आहेत. ते आता काहीही बरळत आहेत. हा बाबा स्वप्नात आहे की बावचळून गेलाय हेच कळेना झालंय, असे त्यांनी म्हणत 'आम्हाला सल्ले देत उगाच गरळ ओकू नका'असा इशाराही त्यांनी दिला आहे. 
एका बाजुला चंद्रकांत पाटील यांच्याकडून पवार कुटुंबावर टीका सुरू असताना राष्टÑवादी कॉँग्रेसकडून मात्र अपवाद वगळता त्याचा प्रतिवाद केलेला दिसत नाही. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जंगलातील शंभर कुत्रे मिळून एका वाघाची शिकार करू शकत नाहीत. ते फक्त भुंकू शकतात, असे उत्तर दिले खरे पण त्यामुळे खालच्या पातळीवरील भाषा वापरली म्हणून आव्हाडांवरच टीका झाली. 
या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी पाटील यांना दिलेल्या उत्तराची मात्र चर्चा आहे. पाटील यांना थेट इशारा देत शेट्टी म्हणाले, एखादी कंपनी बोलवायची. मांडवली करायची. पंचनामा करायचा म्हटला तर कृषी अधिकाºयापासून ते कार्यकारी अभियंत्यापर्यंत करावा लागेल. बिंदू चौकात एकदा कुस्ती होऊनच जाऊ द्या. अंगावर आलात तर अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. 

Web Title: Chandrakant Patil's "sycological Strike" on Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.