अभिषेक बच्चनने केले असे काही की करण जोहरने कधीच खेळली नाही होळी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 03:16 PM2019-03-19T15:16:30+5:302019-03-19T15:18:25+5:30
होय, करण जोहर होळी साजरी करत नाही. याचे कारण काय तर त्याच्या मनात घर करून बसलेली भीती.
बॉलिवूडमध्ये होळी हा सण हर्षोल्हासात साजरा होतो. अनेक स्टार्सच्या घरी होळीची पार्टी रंगते आणि दरवर्षी या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. अर्थात बॉलिवूडमध्ये असे काही स्टार्स आहेत, जे होळी साजरी करणे टाळतात. यातलेच एक नाव म्हणजे, करण जोहर. होय, करण जोहर होळी साजरी करत नाही. याचे कारण काय तर त्याच्या मनात घर करून बसलेली भीती. होय, गतवर्षी एका रिअॅलिटी शोच्या व्यासपीठावर करणने होळी साजरी न करण्यामागचे कारण सांगितले होते. बॉलिवूडच्याच एका व्यक्तिमुळे करणच्या मनात होळीबद्दल भीती निर्माण झाली, जी आजतागायत दूर झालेली नाही. ही व्यक्ती कोण तर अभिषेक बच्चन.
होय, करण त्यावेळी १० वर्षांचा होता. त्यावेळचा हा किस्सा. करणने सांगितले होते की, ‘त्यावेळी आम्ही दरवर्षी अमिताभ बच्चन यांच्याकडे होळी पार्टीसाठी जायचो. मला रंग खेळणे अजिबात आवडायचे नाही. पण त्या दिवशी मी अमिताभ यांच्या घरी पोहोचलो आणि अभिषेकने मला पूलमध्ये ढकलले. मी इतका ओशाळलो की, त्यानंतर मी कधीच होळी खेळली नाही.’
या घटनेनंतर करणने होळी खेळणे सोडले. पण अभिषेक बच्चनसोबतच्या मैत्रीवर मात्र या घटनेचा जराही परिणाम झाला नाही. अभिषेक व करण आजही चांगले मित्र आहेत. अभिषेकची बहीण श्वेता बच्चन हिच्यासोबत तर करणचे खास बॉन्डिंग आहे.
होळीबद्दलचा आणखी एक किस्साही करणने सांगितला होता. लहानपणी माझ्या कॉलनीची मुले सिल्व्हर पेंट घेऊन माझ्यामागे धावायचे. त्यांच्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी मी धावत सुटायचो आणि हमखास पडायचो. मला लागायचे. यानंतर त्या मुलांसोबत माझे जोरदार भांडण व्हायचे, असे त्याने सांगितले होते.