एबी डिव्हिलियर्स लिहितो...
गोलंदाजांच्या वन-डे रँकिंगवर नजर टाका. जसप्रीत बुमराह जगात अव्वल स्थानी असल्याचे तुम्हाला दिसेल आणि आकडे कधी खोटे सांगत नाहीत. बेंगळुरूमध्ये आयपीएलच्या चुरशीच्या लढतीत अंतिम टप्प्यात तो माझ्या तुलनेत सरस ठरला आणि त्यामुळेच मुंबई इंडियन्सला या रंगतदार लढतीत ६ धावांनी विजय मिळवता आला. याचे सर्व श्रेय बुमराहला जाते. त्याने शानदार मारा केला.
आमच्यासाठी या लढतीचा शेवट निराशाजनक ठरला. काय करायला हवे, हे मला कळलेच नाही. आयपीएल लढतीत अखेरपर्यंत नाबाद राहिल्यानंतरही संघाला पराभव स्वीकारावा लागण्याची ही पहिलीच वेळ होती. मुंबईने १८७ धावांची मजल मारली. त्यांनी आक्रमक सुरुवात केली, पण आम्ही नियमित अंतरात बळी घेत पुनरागमन करण्यात यशस्वी ठरलो. लक्ष्याचा पाठलाग करतानाही अखेरच्या पाच षटकांत आम्हाला ६१ धावांची गरज होती आणि ७ फलंदाज शिल्लक होते. एक मोठे षटक आम्हाला लढतीत कायम ठेवणार होत’. त्यानंतर बुमराहने चेंडू घेतला. त्याच्याकडे विशेष कौशल्य आहे. तो मनगटाच्या जोरावर काहीतरी करत असावा किंवा आणखी काही वेगळे करीत असावा. मी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये यापूर्वी अशी गोलंदाजी कधीच खेळलो नाही. दडपणाखाली अनेक खेळाडू गोंधळतात, पण बुमराह रणनीतीवर कायम असतो.
आम्हाला अखेरच्या ३ षटकांत ४० धावांची गरज होती. १८ व्या षटकात आम्ही १५ धावा वसूल करण्यात यशस्वी ठरलो, पण १९ व्या षटकांत बुमराहने अचूक मारा कायम राखला. मी त्याला लक्ष्यापासून विचलित करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने माझा पाठलाग करीत यॉर्कर चेंडू टाकला. ३ बळी घेणारा जसप्रीत बुमराह सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
Web Title: IPL 2019: Never bowling like bumarahs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.