Lok Sabha Election 2019: अहमदनगरमध्ये युतीपुढे मोदी लाट तर आघाडीपुढे मताधिक्य वाढविण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 11:42 AM2019-04-04T11:42:01+5:302019-04-04T11:43:44+5:30
जिल्ह्याच्या राजकारणाची आगामी दिशा ठरविणाऱ्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीपुढे मोदी लाट टिकविण्याचे, तर आघाडीसमोर मागील मताधिक्य वाढविण्याचे आव्हान आहे.
अण्णा नवथर
अहमदनगर : जिल्ह्याच्या राजकारणाची आगामी दिशा ठरविणाऱ्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीपुढे मोदी लाट टिकविण्याचे, तर आघाडीसमोर मागील मताधिक्य वाढविण्याचे आव्हान आहे. विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे तिकीट कापून ऐनवेळी डॉ़ सुजय विखे यांना उमेदवारी दिल्याने भाजप व काँग्रेसमध्ये फूट पडली आहे़ या फाटाफुटीचा फायदा कुणाला होईल, याबाबत उत्सुकता निर्माण आहे़
निवडणूक प्रचारासाठी उणेपुरे १८ दिवस शिल्लक आहेत़ त्यामुळे थेट मतदारांशी संवाद साधून आघाडी व महायुतीचे उमेदवार आपला जनाधार वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत़. मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती़ त्यामुळे २००९ मध्ये ३ लाख मते मिळालेल्या खासदार गांधींनी २०१४ मध्ये ६ लाखांचा टप्पा पार केला होता़ त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही मोदी लाटेचा परिणाम दिसला़ या मतदारसंघात विधानसभेचे नगर शहर, पारनेर, कर्जत-जामखेड, श्रीगोंदा, शेवगाव-पाथर्डी आणि नगर- राहुरी या मतदारसंघाचा समावेश आहे़ विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीत सेना, भाजप व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या होत्या़ मोदी लाटेमुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची एक जागा वाढली़ मतविभाजनाचा फटका सेनेला बसला़
सेनेचा बालेकिल्ला असलेल्या नगर शहरात घड्याळाचा प्रथमच गजर वाजला़ आता लोकसभेला युतीची घोषणा झाल्याने स्थानिक नेत्यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला़ पण मोदी लाट ओसरल्याने ते काय करिश्मा करतात?, ते पाहावे लागेल़ सन २००९ मध्ये राष्ट्रवादीच्या शिवाजी कर्डिले यांचा व २०१४ मध्ये राजीव राजळे यांचा भाजपच्या गांधींनी पराभव केला होता़
या पराभवाची सल राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आहे़ त्यामुळे राष्ट्रवादीने यावेळी तोडीस तोड उमेदवार दिला़ परंतु, मागील दोन निवडणुकांमध्ये घटलेले मताधिक्य राष्ट्रवादी कसे वाढविणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़
मतदारसंघातील आतापर्यंतचा सूर
२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रातून सेना, राष्ट्रवादी आणि भाजपला समान जागा मिळाल्या होत्या़ २०१४ मध्ये मोदी लाट असतानाही राष्टÑवादीला दोन जागा मिळाल्या आहेत़ श्रीगोंद्यात २००९ मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविलेल्या माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी २०१४ मध्ये भाजपकडून निवडणूक लढविली़ मात्र मोदी लाट असूनही त्यांचा पराभव झाला़ शेवगाव- पाथर्डी मतदारसंघात राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले यांचा भाजपच्या मोनिका राजळे यांनी पराभव केला़ राष्ट्रवादीचे घुले पराभूत झाले असले तरी त्यांच्या मतांची आकडेवारी ८० हजारांहून अधिक आहे़ त्याचा फायदा राष्ट्रवादीला या निवडणुकीत होईल़
आयाराम गयारामांमुळे मतविभाजन
पारनेर सेनेचा बालेकिल्ला असला तरी सेनेचे निलेश लंके राष्ट्रवादीत आले आहेत़ त्यामुळे पारनेरमध्ये मताधिक्य मिळण्याची राष्ट्रवादीला आशा आहे़ युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी २०१४ मध्ये नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढविली होती़ यावेळी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाल्याने ते राष्ट्रवादीसोबत आहेत़ युती झाल्याने अभय आगरकरही युतीसोबत आहेत़ पारनेरमध्ये सुजित झावरे, माधवराव लामखडे यांच्या जोडीला निलेश लंके आलेले आहेत़
‘सोधा’ पक्षाची जादू चालणार का?
आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांचे सासरे असलेले भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले युतीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत़ परंतु ते आतून जावयांना मदत करणार की विखे यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, याबाबत साशंकता आहे़पारनेरचे सुजित झावरे आ़ अरुण जगताप यांचे जावई आहेत़ भाजपच्या पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे ह्या काँगे्रसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भाचे सून आहेत़