वजन कमी करण्यासाठी जेवणंच बंद करणं, फक्त फळांवर राहणं, नको तेवढं पाणी पिणं असे विविध प्रकार मुली करत असतात. वजन कमी करणे म्हणजे पोटाचे हाल करुन घेणे असे होत नाही. वजन कमी करण्यासाठी आहारात योग्य बदल करणे आवश्यक असतेच यात काही वाद नाही. (Don't make the mistake of starving yourself to lose weight, 'one' change in diet - the weight will fall off)मात्र व्यवस्थित आहार असायलाच हवा. उपाशी राहून कमी झालेले वजन पुन्हा लगेच वाढते. तसेच शरीर कमकुवत होते. त्यामुळे आपल्या रोजच्या भारतीय आहारातच थोडे साधे सोपे बदल करुन पाहा. नक्की फायदा जणवेल. ही प्रक्रिया केवळ डाएटिंगपुरती मर्यादित न ठेवता, ती एक जीवनशैली असावी लागते. यासाठी सर्वप्रथम आपल्या जेवणातील तेलाचे प्रमाण मर्यादित करणे अत्यंत आवश्यक आहे. तळलेले-तेलकट पदार्थ कमी खाणे फायद्याचे ठरते. तेल जेवढे कमी कराल तेवढा फायदा होतो. तेलाऐवजी घरचे तूप वापरा. तूप आरोग्यासाठी चांगले असते.
सगळ्या भाज्यांमध्ये पोषण असते. मात्र त्या शिजवताना त्यात भरमसाठ मसाले आणि पळी भरुन तेल घातल्यामुळे त्यातील पोषण मिळत नाही. भाज्या वाफवून किंवा अगदी कमी तेलात परतून खाणे हे अधिक फायदेशीर ठरते. वाफवलेल्या भाज्यांमध्ये पोषणमूल्य टिकून राहते आणि ते पचनास हलके असतात. तसेच भाजीची मुळ चवही खायला मिळते.
आहारातून जेवढी साखर कमी करता येईल तेवढी कमी करा. साखर हे वजनवाढीचे मुख्य कारण ठरते. म्हणून चहा, कॉफीमध्ये साखरेऐवजी स्टीव्हिया, मध यांसारखे पर्याय वापरणे अधिक चांगले. त्याचप्रमाणे मिठाई, बेकरी पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स हे पूर्णपणे टाळायचा प्रयत्न करा. याशिवाय पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड अन्नपदार्थांपासून शक्यतो दूरच राहा. कारण त्यात वापरलेले साखर, मीठ शरीरातील चरबी वाढवते. जेवणात प्रथिने (Protein) आणि फायबर्सचा समावेश वाढवावा. उदा. मूग, चवळी, डाळी, लो फॅट पनीर, आदी. यामुळे पोट भरते आणि सतत भूक लागत नाही.
तसेच, दिवसभरात पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकायला मदत करते. जेवणाच्या वेळा निश्चित असाव्यात आणि रात्री हलके जेवण करून लवकर झोपणे आवश्यक आहे. झोप पुरेशी न झाल्यास भूक वाढते आणि वजन कमी होण्यास अडथळा निर्माण होतो.