मुंबईची लाइफलाइन, लोखोंचा रोजचा आधार आणि दळणवळणाचं स्वस्त साधन म्हणजे लोकल ट्रेन. पण इथे ट्रेन पकडणं म्हणजे सोपं नाही त्यासाठी खरंतर वेगळी शिकवणीच सुरु करायला हवी. नवीन असाल तर ट्रेनमध्ये कसे चढावे किंवा कोणती ट्रेन तुम्हाला सुखरुप पोहचवेल. कारण वाढती गर्दी आणि कमी होत चालेली सहिष्णूता नवीन लोकांना तर घाबरवून सोडते. ममतेच्या मूर्ती मानल्या जाणाऱ्या महिला तर लेडिज डब्यात पाहायला मिळत नाहीत. (Ladies compartment of Mumbai local is hard to survive , what happens and why ?)सगळ्यात कठोर आणि निष्ठुर होऊन दरवाजे रोखून उभ्या असतात. गेल्या काही वर्षात चालत्या ट्रेनमधून लोकं पडण्याच्या बातम्या वाढल्या आहेत. त्यात पडणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे. फक्त योगायोग आहे की आणखी काही ?
जनरल डब्यात जर तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तर दरवाज्यावर लटकत जाणाऱ्या पुरुषांनी एकमेकांची पाठ पकडलेली असते आणि पायच्या मदतीने आधारही दिला असतो. जागा नसली तरी एकमेकांना धरुन ते उभे असतात. अर्थात काही डब्यांमध्ये मारामारीही पाहायला मिळते तरी प्रमाण कमीच. त्या उलट महिलांच्या डब्यात पाहिले तर जागा असूनही धक्का मारणं शिवी, गाळ करण सुरु असतं. मध्यांतरी एका मुलीसमोर तिच्या आईला ट्रेनमधून ढकलून देण्यात आलं होतं तर त्याच्याच काही दिवसांनंतर एका महिलेने दुसरीचे केस उपटून काढताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. दिवसेंदिवस हे प्रकार वाढत चालले आहेत.
असाच एक भयंकर प्रकार काही दिवसांपूर्वी घडला. सीएसएमटी - अंबरनाथ लोकल आतमध्ये पूर्ण रिकामी मात्र काही महिलांनी मुद्दाम दरवाजा रोखून धरला. त्याच्या घोळक्यात आत जागा दिसते म्हणून शिरु पाहणाऱ्या एका मुलीसोबत दरवाज्यावरच वाद घालत काही महिलांनी तिला जागा असतानाही आत घेतले नाही. ट्रेन सुटली आणि ठाणे कळवाच्या मध्ये आली आत बसलेल्या महिलांनीही तिला आत घ्या अशी विनंती केली मात्र मुलीचा हात सुटला आणि ती खाली पडली.
काही जणींनी सावधानी दाखवत चेन ओढली. त्या महिलेला जाब विचारायचाही प्रयत्न केला मात्र 'मला नका शिकवू' असं म्हणत महिलांनी उलटी हुज्जत घातली. तिच्या आवाजात आपल्यामुळे एक मुलगी पडली याचं अजिबात दुःख किंवा चिंता जाणवत नव्हती. ही काही एकच घटना नाही , अशा अनेक घडत आहेत . वाढती लोकसंख्या , कायमच उशीरा येणारी लोकल, डोक्यातील ताण , होणारी चिडचिड सगळंच मान्य आहे पण एवढी माणुसकी कमी व्हावी ? लोकलच्या लेडीज डब्यात होणारी भांडणं ऐकून डोळ्यात पाणी येईल एवढ्या वाईट भाषेत महिला वक्तव्य करतात. असे वागणे कितपत योग्य आहे ?
