उपास करणाऱ्या महिलांची दिनचर्या ही त्यांच्या आरोग्याची, मानसिक शांततेसाठी अतिशय महत्त्वाची असते. (5 things women should never forget while fasting, stay healthy while fasting in Shravan, fasting rules ) उपासाला शरीर शुद्धिकरणाची प्रक्रिया वगैरे म्हटले जाते. मात्र उपास करणाऱ्या महिलांची बरेचदा चिडचिड होते. अर्थात शरीराला ज्या गोष्टींची सवय झाली आहे त्यापेक्षा जरा काही वेगळे घडत असल्यावर शरीर प्रतिक्रिया तर देणारंच. त्यामुळे चिडचिड होते. खास म्हणजे चाळीशी आणि पंन्नाशीतल्या महिलांची. पण काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर ही चिडचिड आणि शरीराला होणारा त्रास टाळता येतो. उपासाच्या दिवशी दिनचर्या कशी असावी ते जाणून घ्या.
सकाळीच उपासाची सुरुवात करताना भरपूर पाणी प्यायचे. तसेच तुळशीचे पान खावे. तुळस शरीराला ताकद देते तसेच भुकेवर नियंत्रण ठेवते. उपवास ठेवणे हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा, संयमाचा आणि भक्तीभावाचा विषय आहे. सगळे विविध प्रकारचे उपास ठेवतात. काही महिलांसाठी उपवास म्हणजे पूर्ण अन्नत्याग असते. पाण्याऐवजी त्या काहीच पोटात जाऊ देत नाहीत. तर काही जणी फलाहार करतात. सामान्यपणे काही ठराविक पदार्थ उपासाला खाल्ले जातात. उपास करताना फळे, दूध, साबुदाणा, राजगिरा, शेंगदाणे, मीठ वापरले जाते. पण तेही मोजके आणि पचनास सुलभ असेल, एवढेच घ्यावे. दिवसभर पाणी पीत राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे थकवा येत नाही व शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते.
दिवसभराचा वेळ शक्य असल्यास शांततेत आणि सकारात्मक कार्यात घालवावा. जर ऑफीसला जाणार असाल तर शांत मनाने जायचे. सतत उपासाचा विचार करायचा नाही. काम करणाऱ्या महिलांनी आपली दिनचर्या शक्य तितकी साधी ठेवावी. ऑफिसमध्ये असताना जास्त शारीरिक थकवा येणार नाही याची काळजी घ्यावी. दुपारी थोडा वेळ डोळे मिटून ध्यान करणे किंवा काही क्षण विश्रांती घेणे उपयुक्त ठरते. घरी असलेल्या महिलांनीसुद्धा जास्त कामं न करता रोजच्या एवढीच कामं करावीत. आणि जर कामं जास्त असतील तर पोटाला सतत आधार द्यावा. त्यासाठी फळे आणि सुकामेवा खावा.
सकाळी दूध प्यावे. तसेच संध्याकाळीही दूध प्यावे. दिवसातून दोनदा तरी फळे खावीत. पोटाला आधार मिळेल असे अन्न खावे. तेलकट-तुपकट जरा टाळावे. उपास करणे म्हणजे भुकेले राहणे नाही. तर योग्य आहार घेणे असते. त्यामुळे चांगला आहार घ्यावा.
उपवास सोडताना अगदी हलकं आणि सात्विक अन्न घ्यावं. पोटावर अचानक तिखट आणि जड अन्नाचा मारा केला तर त्याचा पचनसंस्थेला त्रास होतो. खाताना साधे पदार्थच खावे. जसं की फळांचा रस, खीर किंवा साधा वरणभात. जड, तिखट, तेलकट अन्न टाळावे, कारण उपासानंतर पचनक्रिया थोडी नाजूक असते.