तृणधान्ये भारतीय आहाराचा कायमच भाग राहिली आहेत. ज्याला आता आपण मिलेट्स म्हणून ओळखतो. तो प्रकार आपल्याकडे वर्षानुवर्षे खाल्ला जात आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, कोदो, कंगणी, सांवा, कुटकी, राळा, प्रोसो, फॉक्सटेल अशी अनेक तृणधान्ये भारतात उपलब्ध आहेत. या धान्यांमध्ये तंतुमय पदार्थ भरपूर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता कमी होते आणि रक्तातील साखरही नियंत्रित राहते. (millets are a must in the diet, make various delicious dishes with millets, a tasty way to stay healthy)त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांसाठी अशी तृणधान्ये आहारात घ्यावी. ती सगळ्यांसाठीच विशेष उपयुक्त ठरतात. यात प्रथिने, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, जीवनसत्व बी आणि इतरही काही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. तसेच अँटी ऑक्सिडंट्सही यात मोठ्या प्रमाणावर आढळतात. जे हाडे मजबूत करतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात.
तृणधान्यांचा आहारात समावेश करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ही धान्ये पौष्टिक असली तरी ती अति प्रमाणात खाल्ल्यास पचनास त्रास होऊ शकतो, त्यामुळे प्रमाण मर्यादित ठेवणे महत्त्वाचे आहे. तसेच प्रत्येकाचे शरीर वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देते म्हणून नियमित आहारात समाविष्ट करण्यापूर्वी हळूहळू त्यांचा वापर करणे योग्य ठरते. काही तृणधान्यांमध्ये 'गॉइट्रोजेन्स' जास्त असतात. जे थायरॉईडवर परिणाम करु शकतात, त्यामुळे थायरॉईड असणाऱ्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे पदार्थ खावे.
तृणधान्यांपासून अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार करता येतात. ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, नाचणीचे थालीपीठ, वरईचा उपवासासाठी भात तसेच खिचडी असे अनेक पदार्थ असतात. सांव्याची खीर, बाजरीचे लाडू, नाचणीचा शिरा, मिलेट्सचा डोसा, इडली किंवा पोहे यांसारखे विविध प्रकार सहज करता येतात. आजकाल मिलेट्सपासून पास्ता, नूडल्स आणि बिस्किटेही केले जातात. बाजारात ते उपलब्ध आहेत. ज्यामुळे पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही स्वरुपात ते खाती येतील. तसेच लहान मुलांना असे पदार्थ आवडतात त्यातून भरपूर पोषण मिळते. वजन कमी करायचे असेल तर आहारात तृणधान्ये असायलाच हवीत. वजन कमी होते आणि पोटही भरते.
एकूणच तृणधान्ये आरोग्यासाठी उत्तम आहेत. योग्य प्रमाणात आणि विविधतेने त्यांचा आहारात समावेश केल्यास वजन नियंत्रणात राहते, पचन सुधारते, दीर्घकालीन आजारांपासून बचाव होतो आणि दैनंदिन उर्जेची गरज नैसर्गिकरीत्या पूर्ण होते.