Is honey beneficial or harmful in summer : बाहेरचं तापमान वाढलं की, आपल्या शरीर देखील सामान्यापेक्षा जास्त तापायला लागतं. त्यामुळे या दिवसांमध्ये अशा गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो, ज्या आपलं शरीर आतून थंड ठेवतील. पण अनेकांना हेच माहीत नसतं की, कोणते पदार्थ थंड असतात आणि कोणते उष्ण. अशात जर नकळतपणे उष्ण पदार्थ खाल्ले गेले तर शरीर आतून आणखी जास्त तापतं. भरपूर लोक रोज मध खातात. म्हणजे रोजच्या आहारात मधाचा समावेश असतो. पण मध तर गरम असतं. मग आपल्याला हे माहीत असणं गरजेचं ठरतं की, ते जास्त प्रमाणात खाल्लं तर नुकसान होईल की काही फायदे मिळतील. आयुर्वेदात यावर काय सांगितलंय ते पाहुयात.
आयुर्वेदात मधाला अमृत मानलं गेलंय. मध हे गरम असतं, पण याचे शरीराला अनेक फायदे होतात. मध जर एखाद्या गोष्टीसोबत घेतलं तर त्याचे गुण अधिक वाढतात. त्यामुळे ते कसं खावं हेही माहीत असणं गरजेचं आहे.
उन्हाळ्यात मध थेट खाण्याचे नुकसान
जर मध कोणत्याही दुसऱ्या पदार्थासोबत न खाता थेट खाल्लं तर शरीरात पित्त वाढू शकतं. उन्हाळ्यात खासकरून शरीराचं तापमान वाढतं आणि जळजळ होण्याचा त्रासही होऊ शकतो.
मध खाण्याची योग्य पद्धत
मध सकाळी लिंबू सरबतात टाकून घेऊ शकता. माठातील पाण्यात मध आणि लिंबू टाकून सकाळी उपाशीपोटी प्याल तर शरीर थंड राहतं. तसेच वजन कमी करण्यासही मदत मिळते.
सत्तूमध्ये घालूनही आपण मध सेवन करू शकता. साखरेच्या जागी सत्तूमध्ये मध टाकलं तर शरीर थंड राहतं आणि ऊर्जा सुद्धा मिळते. या मिश्रणाने शरीर हायड्रेट राहतं आणि थकवाही कमी होतो.
मध दह्यासोबत खाणंही चांगला पर्याय ठरू शकतो. आपण दुपारी दह्यात थोडं मध घालून खाऊ शकता. यामुळे पचनक्रिया चांगली होते. तसेच उन्हापासूनही बचाव होतो.
तूपासोबत मध कधी खाऊ नये. आयुर्वेदानुसार हा विरूद्ध आहार आहे. असं केलं तर शरीराच तापमान वाढू शकतं. वात-पित्ताचं संतुलन बिघडू शकतं.
