विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप उंचावणारे 'ते' खेळाडू सध्या काय करतात?

12 वर्षांपूर्वी विराट कोहलीनं त्याच्या नेतृत्त्व कौशल्याची झलक दाखवली होती. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं अपराजित राहताना 2008च्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडू सध्या काय करतायत, चला जाणून घेऊया...

विराट कोहली - दिल्लीच्या या क्रिकेटपटूंनं जगभरात आपल्या फॅन फॉलोअर्स निर्माण केला आहे. 2008च्या श्रीलंका मालिकेतून त्यानं टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले. त्यानंतर आतापर्यंत त्यानं 248 वन डे, 82 ट्वेंटी-20 आणि 86 कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाच्या तीनही फॉरमॅटचे नेतृत्व त्याच्या खांद्यावर आहे. तीनही फॉरमॅटमध्ये त्यानं अनेक विक्रम आतापर्यंत स्वतःच्या नावावर केले आहेत.

रवींद्र जडेजा - 2008च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील या खेळाडूनं विराटनंतर सर्वाधिकवेळा टीम इंडियाच्या वरिष्ठ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. जडेजानं 165 वन डे, 49 ट्वेंटी-20 आणि 49 कसोटी सामने खेळले आहेत. टीम इंडियाचा हा सर्वाधिक यशस्वी अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो.

तन्मय श्रीवास्तव - 2008च्या वर्ल्ड कपमध्ये त्यानं 52च्या सरासरीननं 262 धावा कुटल्या होत्या आणि स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तन्मयनं अव्वल स्थान पटकावले होते. पण, कानपूरच्या या क्रिकेटपटूला वरिष्ठ संघात स्थान पटकावता आले नाही. त्यानं इंडियन प्रीमिअर लीगमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब, कोची टस्कर्स आणि डेक्कन चार्जर्स संघाचे प्रतिनिधित्व केलं, परंतु त्याला आपली छाप पाडता आली नाही.

तरुवर कोहली - मधल्या फळीचा फलंदाज असूनही पंजाबच्या या खेळाडूला 2008च्या वर्ल्ड कपमध्ये सलामीला खेळायला लावले. त्यानं गटातील पहिल्या तीन सामन्यांत सलग अर्धशतकी खेळी केली. त्यानं संपूर्ण स्पर्धेत 43.60च्या सरासरीनं 218 धावा केल्या. भारताकडून तो दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. पण, तरीही त्याला वरिष्ठ संघात स्थान मिळाले नाही. आयपीएलमध्ये त्यानं राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व केले. रणजी करंडक स्पर्धेत त्यानं झारखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्रिशतक झळकावले होते. 2019मध्ये 31 वर्षीय फलंदाजानं पुनहा रणजी स्पर्धेत दुसरे त्रिशतक झळकावले.

अभिनव मुकूंद - 2008च्या वर्ल्ड कपमध्ये एकही सामना न खेळणाऱ्या या खेळाडूनं स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यानं मुरली विजयसोबत पहिल्या विकेटसाठी 400 धावांची भागीदारी केली होती. तामीळनाडूकडून त्यानं त्रिशतकही झळकावलं आहे. 2011च्या इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याला वरिष्ठ संघातून कॉल आला होता. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांना विश्रांती दिल्यामुळे अभिनवला कसोटीत पदार्पण करता आले होते. तीन कसोटीत त्याला केवळ एक अर्धशतक आणि 49 धावांची खेळी करता आली. 2016/17 च्या स्थानिक क्रिकेटमध्ये त्यानं चार शतकांसह 849 धावा चोपल्या होत्या. तामीळनाडूकडून त्यानं 100 रणजी सामने खेळण्याचा पराक्रम केला आणि 7000 धावा केल्या आहेत.

श्रीवत्स गोस्वामी - 2008च्या वर्ल्ड कप विजेत्या यष्टिरक्षकानं सलामीला येताना स्पर्धेत 152 धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व केले आणि पहिल्याच सत्रात त्यानं 23 वर्षांखालील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला.

अजितेश अर्गाल - भारताच्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप विजयात या खेळाडूनं सर्वात मोठा उचलला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्यानं पाच षटकांत 7 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. पण, त्याला वरिष्ठ संघात संधी मिळाली नाही.

मनीष पांडे - 2008च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील या खेळाडूला वरिष्ठ संघात स्थान मिळाले, परंतु त्याला सातत्य राखता आले नाही.

सौरभ तिवारी - महेंद्रसिंग धोनीचा डुप्लिकेट म्हणून सौरभनं सुरुवातीला हवा केली. 2008 मध्ये मुंबई इंडियन्सनं त्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. 2010चा 23 वर्षांखालील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार त्यानं पटकावला. त्यानं 16 सामन्यांत 419 धावा केल्या होत्या. त्या टीम इंडियात केवळ 3 वन डे सामने खेळण्याची संधी मिळाली.

सिद्धार्थ कौल - वर्ल्ड कप स्पर्धेत पाच सामन्यांत 10 विकेट्स घेणारा हा पंजाबचा हा गोलंदाज वरिष्ठ संघाकडून खेळला. आयर्लंडकडून त्यानं ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले. त्यानंतर त्यानं इंग्लंडविरुद्ध वन डेत पदार्पण केले. पण, त्याला संघात स्थान टिकवता आले नाही.

दुव्वारपू सीवा कुमार - वर्ल्ड कप स्पर्धेत हाही खेळाडू एकही सामना खेळला नाही. आंध्रपदेशच्या या खेळाडूनं 42 सामन्यांत 133 विकेट्स घेतल्या.

पेरी गोयल - हाही एकही सामना खेळला नाही. पंजाबच्या या खेळाडूला वरिष्ठ संघातही संधी मिळली नाही.

नापोलीओन एनिस्टेन - वर्ल्ड कपमध्ये एकच सामना खेळला. तामीळनाडूकडून त्यानं रणजी स्पर्धेत पदार्पण केले. केरळविरुद्ध त्यानं 92 धावा आणि दोन विकेट अशी अष्टपैलू कामगिरी केली.

इक्बाल अब्दुल्ला - युवा वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं 13 सामन्यांत 10 विकेट्स घेतल्या. 2010च्या रणजी मोसमात मुंबईकडून सर्वाधिक 27 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. आयपीएलमध्येही त्यानं कोलकाता नाईट रायडर्सकडून दमदार कामगिरी केली.

प्रदीप सागवान -2008च्या वर्ल्ड कप स्पर्धेत एका सामन्यात पाच विकेट घेणारा हा एकमेव गोलंदाज होता. पण, त्याला वरिष्ठ संघात संधी मिळाली नाही.