IPL 2020 रद्द झाल्यास MS Dhoniसह तीन खेळाडूंना मोठा फटका!

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३व्या मोसमालाही या व्हायरसचा फटका बसलेला दिसत आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) २९ मार्चपासून सुरू होणारी स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएल पुढे ढकलली असली तरी ही स्पर्धा होईल की नाही यावर अजूनही अनिश्चिततेचं सावट आहे. त्यामुळे बीसीसीआयसह फ्रँचायझी मालकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

पण, या आर्थिक फटक्या व्यतिरिक्त खेळाडूंच्या करिअरचा प्रश्न निर्माण झाला आहे. आयपीएल रद्द झाल्यास महेंद्रसिंग धोनीसह तीन भारतीय खेळाडूंना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी आयपीएल हाच पर्याय होता. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि निवड समिती धोनीच्या आयपीएलमधील कामगिरीवर लक्ष ठेवणार होती.

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. त्यामुळे टीम इंडियातील त्याचे स्थान डळमळीत झाल्याची चर्चा आहे. त्यात त्याच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आयपीएलमधून त्याला कमबॅक करण्याची संघी आहे.

धोनीला पर्याय म्हणून रिषभ पंतचे नाव आघाडीवर आहे. पण, संजू सॅमसन त्याला कडवी टक्कर देऊ शकतो.

स्थानिक क्रिकेटमध्ये संजूची बॅट चांगलीच तळपली आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर त्याची निवड करून निवड समितीनं रिषभला धोक्याचा इशाराच दिला. पण, संजूला त्यावर खरं उतरता आले नाही.

त्यामुळे आयपीएलमधील कामगिरी त्याला टीम इंडियात पुन्हा स्थान मिळवून देण्यात फायदेशीर ठरणारी आहे. पण, आयपीएल न झाल्यास त्याला तोटा होऊ शकतो. निवड समिती सॅमसन आणि रिषभ यांना दोघांनाही डच्चू देऊन तिसऱ्या पर्यायाचा विचार करू शकतात.

पृथ्वी शॉने न्यूझीलंड दौऱ्यातून वन डे संघात पदार्पण केले. परंतु त्याला ट्वेंटी-20 संघात स्थान पटकावता आलेले नाही. आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवल्यास सलामीला शिखर धवन हा सक्षम पर्याय आहे. त्यात सलामीला तिसरा पर्याय म्हणून पृथ्वीच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.

त्यामुळे आयपीएलमधील कामगिरी त्याला ट्वेंटी-२० संघात स्थान मिळवून देऊ शकते. पण, त्यासाठी आयपीएल होणे आणि पृथ्वीची बॅट तळपणे महत्त्वाची आहे. सलामीसाठी धवन, लोकेश राहुल आणि रोहित शर्मा हे फलंदाज आघाडीवर आहेत.