IPLमध्ये खेळण्यासाठी स्टार गोलंदाज सोडणार पाकिस्तानचं नागरिकत्व?; लंडनमध्ये होणार स्थायिक!

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL) खेळण्याचा मोह जगभरातील सर्वच देशांच्या क्रिकेटपटूंमध्ये आहे.

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL) खेळण्याचा मोह जगभरातील सर्वच देशांच्या क्रिकेटपटूंमध्ये आहे. पण, पाकिस्तानी खेळाडू यापासू वंचितच आहेत. २००८च्या पहिल्या पर्वानंतर पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमधून हद्दपारच केलं. दोन्ही देशांमधील ताणलेल्या संबंधांमुळे हा निर्णय घ्यावा लागला.

आयपीएलला टक्कर देण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पाकिस्तान सुपर लीग सुरू केली. पण, त्यांची अवस्था आज काय आहे हे संपूर्ण जग जाणतं. पाकिस्तानचे खेळाडू अधुनमधून आयपीएलवर टीका करतानाही दिसले आहेत, परंतु जगातील सर्वात श्रीमंत लीगमध्ये खेळण्याची संधी न मिळण्याची खंत ते लपवू शकले नाहीत.

पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आमीर ( Pakistan pacer Mohammad Amir) यानं गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. २९ वर्षीय आमीर हा सध्या कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये राहत आहे आणि तेथील नागरिकत्व स्वीकारून आयपीएलमध्ये खेळण्याचं स्वप्न पाहत आहे.

मोहम्मद आमीरनं निवृत्ती जाहीर करताना पाकिस्तान क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोपही केले. त्यामुळेच या देशासाठी खेळण्याची इच्छा राहिली नसल्याचे, आमीरनं स्पष्ट केलं. सध्याचं संघ व्यवस्थापक बदलल्यानंतर देशाकडून पुन्हा खेळीन, असंही तो म्हणाला होता.

दरम्यान, आमीर सध्या लंडनचे नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी तो पाकिस्तानचे नागरिकत्व सोडण्यासही तयार आहे आणि जर तो ब्रिटीश नागरिक झालाच तर आयपीएलमध्ये खेळण्यासाठी तो पात्र ठरू शकतो.

''मला लंडनमध्ये राहण्याची परवानगी मिळाली आहे. इथे क्रिकेट खेळण्याचा आनंद मी लुटत आहे आणि अजूनही 6-7 वर्ष क्रिकेट खेळत राहण्याचा माझा प्रयत्न आहे. पाहू पुढे काय होतंय ते. माझी मुलं इंग्लंडमध्ये वाढत आहेत आणि येथेच शिक्षण सुरू आहे. त्यामुळे येथे त्यांच्यासोबत मी भरपूर वेळ घालवत आहे,''असे आमीर म्हणाला.

आयपीएलच्या पहिल्या पर्वानंतर आयपीएलमध्ये खेळणाऱ्या पहिल्या पाकिस्तानी खेळाडूचा मान अझर महमूदनं मिळवला होता. पण, तो इंग्लंडचा खेळाडू म्हणून पंजाब किंग्स व कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता. आयपीएलमध्ये खेळण्याच्या संधीबद्दल आमीर म्हणाला,''जोपर्यंत ब्रिटिश नागरिकत्व मिळत नाही, तोपर्यंत मी या संधीचा विचार करत नाही.''

''पाकिस्तानी क्रिकेट संघाकडून निवत्ती घेण्याचा निर्णय सोपा नव्हता. त्या निर्णयामागे अनेक कारणं होती. मला पुन्हा पुन्हा तेच तेच सांगायचे नाही. आशा करतो की आणखी कोणा खेळाडूला त्याचा सामना करावा लागू नये. त्यांना माझ्यासारखं करिअरवर पाणी फेरावे लागू नये, हीच प्रार्थना,''असेही तो म्हणाला.

2017च्या चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं भारतावर विजय मिळवला होता. त्या सामन्यात आमीरनं 6 षटकांत 16 धावा देताना तीन ( रोहित शर्मा, विराट कोहली व शिखर धवन) महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. त्यानं 36 कसोटी, 61 वन डे व 50 ट्वेंटी-20 सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केलं आहे.