HeartBreaking: 'विराट कंपनी'च्या तमाम चाहत्यांना 'हे' आकडे पाहून खूपच वाईट वाटेल!

18.05 - भारतीय संघाने या मालिकेत प्रती विकेट 18.05च्या सरासरीनं धावा केल्या. ही टीम इंडियाची आतापर्यंतची तिसरी निचांक कामगिरी आहे. यापूर्वी न्यूझीलंड दौऱ्यातच 2002-03मध्ये ही सरासरी 13.37 आणि 1969-70 मध्ये 16.61 इतकी होती.

242 - भारतीय संघाने चार डावांमध्ये केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेतील टीम इंडियाची ही दुसरी निचांक कामगिरी आहे. यापूर्वी, 2002-03च्या न्यूझीलंड दौऱ्यात भारताची सर्वोत्तम कामगिरी ही 161 धावांची होती.

34.61 - न्यूझीलंडच्या तळाच्या तीन फलंदाजांची या मालिकेतील ही सरासरी. दोन डावांमध्ये तळाच्या तीन फलंदाजांनी 205 धावा केल्या आणि त्यात दोन अर्धशतकी भागीदारींचा समावेश आहे. दुसऱ्या कसोटीत कायले जेमिसन - नील वॅगनर यांनी आठव्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली.

पहिल्या कसोटीत जेमिसन व कॉलीन डी ग्रँडहोम यांनी आठव्या विकेटसाठी 71 धावांची आणि जेमिसन व ट्रेंट बोल्ट यांनी शेवटच्या विकेटसाठी 38 धावा जोडून 183 धावांची आघाडी मिळवून दिली. त्याउलट भारताच्या तळाच्या फलंदाजांना चार डावांत मिळून 10.33च्या सरासरीनं केवळ 124 धावा करता आल्या.

2014-15च्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाच्या तळाच्या तीन फलंदाजांना अनुक्रमे 42.92 व 43.50च्या सरासरीनं धावा करू दिल्या होत्या.

58 - भारताकडून या मालिकेत सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा मान मयांक अग्रवालनं पटकावला. पण, त्याची ही 58 धावांची खेळी दोन किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेतील टीम इंडियाकडून नोंदवलेली सर्वात निचांक खेळी आहे.

0- या मालिकेत भारताच्या एकही फलंदाजाला शतक झळकावता आलेले नाही. 2002-03च्या न्यूझीलंड दौऱ्यानंतर टीम इंडियावर प्रथमच अशी नामुष्की ओढावली. त्यानंतर भारतीय संघ 60 कसोटी मालिका खेळला.

2011-12 - दोन किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने व्हाईटवॉश पत्करण्याची ही आठ वर्षांनंतरची पहिलीच वेळ आहे. 2011-12सा इंग्लंडने 4-0 अशा फरकाने मालिका जिंकली होती. न्यूझीलंडविरुद्ध 2002-03मध्ये टीम इंडियाला व्हाईटवॉश ( 2-0) स्वीकारावा लागला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हा पहिलाच व्हाईटवॉश आहे.

9.50 - या मालिकेत विराट कोहलीने ( 2, 19, 3 आणि 14) 9.50च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. कोहलीची ही दुसरी निराशाजनक कामगिरी आहे. 2016-17च्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत कोहलीनं 9.20च्या सरासरीनं 46 धावा केल्या होत्या.

14- टीम साऊदीनं या मालिकेत 14 विकेट्स घेतल्या. यापूर्वी त्यानं वेस्ट इंडिजविरुद्धच्या ( 2013-14) मालिकेत 18 विकेट्स घेतल्या होत्या.