India vs Australia, 4th Test : आर अश्विन, जसप्रीत बुमराह नाही; चौथ्या कसोटीत दोन पदार्पणवीर घेऊन मैदानावर उतरली टीम इंडिया

विराट कोहली, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा व हनुमा विहारी यांच्याशिवाय टीम इंडिया या कसोटी मालिकेत खेळली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाच्या मानगुटीवर बसलेले दुखापतीचे ग्रहण ब्रिस्बेन कसोटीतही कायम आहे.

कर्णधार अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) दुसऱ्या कसोटीत शुबमन गिल व मोहम्मद सिराज यांनी कसोटीत पदार्पण केले. त्यानंतर तिसऱ्या कसोटीत नवदीप सैनीचे पदार्पण झाले आणि आता चौथ्या कसोटीत दोन खेळाडूंनी पदार्पण केले.

२०१५नंतर टीम इंडियानं मैदानावर उतरवलेल्या अंतिम ११मध्ये आताची गोलंदाजीची फळी ही सर्वात कमी अनुभव असलेली आहे. चौथ्या कसोटीत मैदानावर उतरवलेल्या अंतिम ११मधील गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज ( ७), नवदीप सैनी ( ४) आणि रोहित शर्मा ( २) यांच्या नावावर एकूण १३ विकेट्स आहेत. इतरांची पाटी कोरीच आहे.

१९६०-६१नंतर ( वि. पाकिस्तान) टीम इंडियान एका मालिकेत २०हून अधिक खेळाडूंचा वापर केला. पाकिस्तानविरुद्धच्या त्या मालिकेत टीम इंडियानं १९ खेळाडूंचा वापर केला होता.

१९९६च्या मालिकेत इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियानं ५ किंवा त्यापेक्षा अधिक खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली होती. सुनील जोशी, पारस म्हाम्ब्रे, प्रसाद, व्ही राठोड, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी त्या मालिकेत पदार्पण केले.

तिसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजा, रिषभ पंत, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, हनुमा विहारी जायबंदी झाले होते. त्यापैकी केवळ रिषभ पंत चौथ्या कसोटीसाठी तंदुरूस्त झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाला आणखी चार प्रमुख खेळाडूंशिवाय मैदानावर उतरावे लागले आहे.

पहिल्या आणि चौथ्या कसोटीतील अंतिम ११ खेळाडूंमध्ये फरक पाहिल्यास चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे हे दोनच खेळाडू चारही सामने खेळले आहेत.

आजच्या सामन्यात टी नटराजन ( T Natarajan) आणि वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) यांनी कसोटीत पदार्पण केले आहे. दोन गोलंदाजांचे पदार्पण आणि दोन खेळाडू दुसरीच कसोटी खेळत आहेत.

एकाच दौऱ्यावर वन डे , ट्वेंटी-20 आणि कसोटी संघात पदार्पण करणारा टी नटराजन हा पहिलाच भारतीय ( जगभरात १७वा) ठरला आहे. एकाच सत्रात तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा भुवनेश्वर कुमार ( २०१२-१३) याच्यानंतरचा दुसरा भारतीय ठरला.

टीम इंडियाची Playing XI : रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, मयांक अग्रवाल, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, टी नटराजन

ऑसी गोलंदाजांच्या नावावर १०४६ विकेट्स, भारताच्या खेळाडूंकडे फक्त १३ बळी