India vs Australia, 2nd T20I : युजवेंद्र चहलनं केली जसप्रीत बुमराहशी बरोबरी, पण नकोसा विक्रमही केला नावावर

India vs Australia, 2nd T20I: टीम इंडियानं पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात मालिका वाचवण्याचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर आहे. त्यात दुखापतीनं त्यांना त्रस्त केले आहे. असे असूनही मॅथ्यू वेड ( Matthew Wade) व डी'आर्सी शॉर्ट यांनी संघाला दमदार सुरूवात करून दिली. वेडच्या फटकेबाजीनंतर स्टीव्हन स्मिथनं आक्रमक खेळ केला आणि ऑस्ट्रेलियानं भारतासमोर तगडं आव्हान ठेवलं.

फिंचच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची जबाबदारी मिळालेल्या मॅथ्यू वेडनं डी'आर्सी शॉर्टसह डावाची सुरुवात केली. वेडनं आक्रमक पवित्रा घेताना भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. पहिल्या चार षटकात कर्णधार विराट कोहलीनं चार तीन गोलंदाजांना पाचारण केलं. दीपक चहरच्या पहिल्याच षटकात वेडनं १३ धावा कुटल्या.

त्यात एका अतरंगी फटक्याचाही समावेश होता. वेडनं पहिल्या चार षटकांत ऑस्ट्रेलियाला ४६ धावा करून दिल्या. टी नटराजननं पाचवं षटक फेकलं आणि त्याच्या पहिल्याच षटकात ऑसींना धक्का बसला. श्रेयस अय्यरनं सीमारेषेनजीक शॉर्टचा ( ९) झेल टिपला.

वेडनं पहिल्याच षटकात दीपक चहरच्या गोलंदाजीवर मारलेला फटका चर्चेचा विषय ठरत आहे. ४३ धावांवर असताना हार्दिक पांड्यानं ऑसी कर्णधाराचा झेल सोडला. ऑस्ट्रेलियानं पहिल्या पॉवरप्लेमध्ये १ बाद ५९ धावा केल्या.

वेडनं २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. त्याचं हे ट्वेंटी-20तील दुसरे अर्धशतक ठरलं आणि या दोन्ही ५०+ धावा भारताविरुद्धच केल्या आहेत.

८व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर वेडचा सोपा झेल विराट कोहलीकडून सुटला. वेडलाही वाटलं होतं की हा झेल टिपला जाईल आणि त्यामुळे तो क्रिज सोडून बराच पुढे आला होता. विराटनं लगेच चेंडू थ्रो करून वेडला धावबाद केले. वेडनं ३२ चेंडूंत १० चौकार व १ षटकार खेचून ५८ धावा केल्या.

त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलनं १३ चेंडूंत २ षटकारांसह २२ धावा केल्या. शार्दूल ठाकूरनं त्याला बाद केलं. त्यानंतर मोइजेस हेन्रीक्स याच्यासह स्मिथनं ४७ धावा जोडल्या.

स्मिथ ३८ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून ४६ धावांवर युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. हेन्रीक्सही 18 चेंडूंत 26 धावा करून टी नटराजनच्या गोलंदाजीवर बाद झाला. नटराजननं 19 धावांत 2 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियानं 5 बाद 194 धावा केल्या.

स्मिथच्या विकेटसह युजवेंद्रनं भारताकडून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहच्या सर्वाधिक ५९ विकेट्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. चहलनं ५० धावांत १ विकेट घेतली.

पण, त्याच्या नावावर एक नकोसा विक्रमही नोंदवला गेला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक ३ वेळा ५०+ धावा देणारा गोलंदाज तो बनला. मोहम्मद सिराज आणि कृणाल पांड्या यांनी प्रत्येकी २ वेळा अशी कामगिरी केली होती.