IND Vs SL 2nd T20I Live : अम्पायरच्या चुकीमुळे हरला भारत, राखीव खेळाडूंनी श्रीलंकेला रडवलेच होते!

IND vs SL 2nd T20I Int Live Score : शिखर धवननं एकाकी झुंज दिल्यामुळे टीम इंडियानं दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात श्रीलंकेसमोर १३३ धावांचे लक्ष्य ठेवले. शिखरनं ४० धावांची खेळी केली, त्याला देवदत्त पडिक्कल ( २९) व ऋतुराज गायकवाड ( २१) या पदार्पणवीरांची साथ मिळाली. संजू सॅमसनचं अपयश हे टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत आहे.

माफक धावांचे लक्ष्यही श्रीलंकेच्या संघाला भारी पडल्याचे दिसले. टीम इंडियाच्या राखीव फळीतील 'राखीव' खेळाडूंनी यजमानांना विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. श्रीलंकेनं अखेरच्या षटकात सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. धनंजया डी सिल्व्हा ( ३९*) व चमिका ( १२*) यांनी विजय खेचून आणला.

पदार्पणवीर ऋतुराज गायकवाड आणि शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. देवदत्त पडिक्कल आणि शिखर यांची ३२ धावांची भागीदारी अकिला धनंजयानं संपुष्टात आणली. देवदत्त व संजू सॅमसन यांना मोठी खेळण्याची संधी होती, परंतु त्यांनाही खुलून फटके मारता आले नाही.

वनिंदु हसरंगा यानं टाकलेल्या १६व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर देवदत्तनं सुरेख रिव्हर्स स्वीप मारून चौकार मिळवला, परंतु पुढच्याच चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. सॅमसनही ( ७) पुढच्या षटकात धनंजयाच्या गोलंदाजीवर बाद झाला. भारताला २० षटकांत ५ बाद १३२ धावा करता आल्या.

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेनं आक्रमक सुरुवात केली, परंतु राहुल चहरनं सुरेख झेल टिपून लंकेला पहिला धक्का दिला. भुवनेश्वर कुमारनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं, त्यानंतर वरुण चक्रवर्थीनं विकेट घेतली. कुलदीप यादवनं भारताला तिसरं यश मिळवून दिलं.

कुलदीप यादवचा आत्मविश्वास आज बरंच काही सांगत होता. त्यानं दुसरी विकेट घेताना मिनोद भानूकाला ( ३६) बाद करून मोठी विकेट मिळवून दिली. पण, कुलदीपनं टाकलेल्या १४व्या षटकात लंकन गोलंदाजांनी १५ धावा काढल्या.

राहुल चहर व चक्रवर्थी यांनी कमाल दाखवताना श्रीलंकेच्या फलंदाजांना झुंजवले. राहुलनं मोक्याच्या क्षणाला टीमला विकेट मिळवून दिली. वनिंदू हसरंगा ( १५) भुवीच्या हातात झेल देऊन माघारी परतला. एकवेळ श्रीलंकेच्या हातात असलेला सामना हळुहळू निसटताना दिसत होता.

चेंडू अन् विजयासाठी आवश्यक धावा यांच्यातले अंतर वाढत गेल्यानं श्रीलंकेचे फलंदाज दडपणाखाली आले अन् त्यांच्या चुकांचा फायदा टीम इंडियाला झाला. चेतन साकरियानं १८व्या षटकात रमेश मेंडिसला ( २) बाद केले.

१२ चेंडूत २० धावांची गरज असताना चिमका करुणारत्नेनं तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. ऑफसाईडच्या दिशेनं मारलेला चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात नवदीप सैनीला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागले. ( Navdeep Saini didn't get a single over and now walks off injured) पाचवा चेंडू निर्धाव गेल्यानंतर पुढच्या चेंडूवर दोन धावा काढल्या.

अखेरच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी ८ धावांची गरज होती अन् अम्पायरनं चेतन सकारियानं टाकलेला दुसरा चेंडू वाईड ( WIDE) दिला. त्यावर लंकेला दोन धावा मिळाल्या अन् त्याचा फटका बसला. लंकन फलंदाज ऑफसाईडला आलेला होता अन् चेतननं चतुराईनं चेंडू त्याच्यापासून दूरच फेकला, पण अम्पायरनं तो वाईड दिला. शिखर धवन व चेतननं या निर्णयावर नाराजी व्यक्त केली...