IND vs ENG, 3rd T20, Virat Kohli : विराट कोहलीचा भारी पराक्रम, आताच्या स्टार फलंदाजांमध्ये नोंदवला तगडा विक्रम

Virat Kohli, IND vs ENG, 3rd T20I विराट कोहलीनं ४६ चेंडूंत नाबाद ७७ धावा केल्या. त्यानं ८ चौकार व ४ षटकार खेचून १२ चेंडूंत ५६ धावा जोडल्या.

Ind Vs Eng 3rd T20 Live Score : लोकेश राहुल, रोहित शर्मा व इशान किशन हे झटपट माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी टीम इंडियाचा डाव सावरला होता. या दोघांनी सुरेख फटके मारताना ३८ धावांची भागीदारी केली. पण, एका धावेसाठी रिषभची विकेट गेली.

विराटनं त्यानंतर दमदार खेळ करताना अर्धशतक पूर्ण केलं आणि टीम इंडियाला मोठा पल्ला गाठून दिला. विराटनं सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावलं, आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमधील त्याचे हे २७ वे अर्धशतक ठरले. कर्णधार म्हणून त्यानं ११वेळा ५०+ धावा केल्या आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याच्या सर्वाधिक अर्धशतकांशी बरोबरी केली.

विराट कोहलीनं ४६ चेंडूंत नाबाद ७७ धावा केल्या. त्यानं ८ चौकार व ४ षटकार खेचून १२ चेंडूंत ५६ धावा जोडल्या. हार्दिक पांड्यानं १७ धावांचे योगदान दिले आणि टीम इंडियानं ६ बाद १५६ धावांचा डोंगर उभा केला. टीम इंडियानं अखेरच्या पाच षटकांत ६९ धावा चोपल्या.

लोकेश राहुलनं ( KL Rahul) पुन्हा अपयशाचा पाढा गिरवला अन् सामन्याच्या तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मार्क वूडनं ( Mark Wood) त्याचा त्रिफळा उडवला. मागील चार ट्वेंटी-२० सामन्यांत तो तिसऱ्यांदा भोपळ्यावर माघारी परतला आहे. ( KL Rahul has 3 ducks in the last 4 innings in T20 Internationals.)

दोन सामन्यांच्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरलेला रोहित शर्माही ( १५) मोठी खेळी करू शकला नाही. मार्क वूडनं त्याला बाद केलं. पदार्पणात अर्धशतक झळकावणारा इशान किशन ( Ishan Kishan) हाही आज कमाल करू शकला नाही. ख्रिस जॉर्डननं त्याला ४ धावांवर माघारी पाठवले. पहिल्या पॉवर प्लेमध्ये भारताच्या ३ बाद २४ धावा झाल्या होत्या.

ट्वेंटी-20 क्रिकेटमधील पॉवरप्लेमधील टीम इंडियाची ही चौथी निचांकी खेळी आहे. २०१६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ३ बाद २१, २०२१मध्ये इंग्लंडविरुद्ध ३ बाद २२ आणि २०१०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ बाद २४ अशी टीम इंडियाची अवस्था झाली होती.

१२व्या षटकात रिषभ पंतनं मारलेल्या फटक्यावर दोन धावा पूर्ण केल्यानंतर इंग्लंडचा यष्टिरक्षकानं चेंडू स्टम्पच्या दिशेनं फेकला, परंतु रिषभ क्रीजवर पोहोचला होता. पण, चेंडूकडे एकही खेळाडू नसल्याचे दिसताच विराटनं तिसऱ्या धावेसाठी कॉल दिला व खेळपट्टीच्या निम्म्यापर्यंत तो धावत आला. रिषभला क्रीज सोडणं भाग पडलं आणि त्यात तो धावबाद झाला.

श्रेयस अय्यरला ( ९) मार्क वूडनं माघारी पाठवले. भारताच्या १५ षटकांत ५ बाद ८७ धावा झाल्या होत्या. १६ व्या षटकात टीम इंडियानं शतक पूर्ण केलं. विराटनं जोफ्रा आर्चरच्या त्या षटकात १३ धावा चोपल्या. विराटनं ३७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांच्या मदतीनं अर्धशतक पूर्ण केलं.

विराट आणि हार्दिक पांड्या यांनी सहाव्या विकेटसाठी २५ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. यात विराटनं १३ चेंडूंत ३९ धावा चोपल्या होत्या. विराटनं आजच्या खेळीनं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्येही धावांची सरासरी ५२+ नेली. कसोटी ( ५७.३७), वन डे ( ५९.३१) आणि ट्वेंटी-20त ५२+ धावांची सरासरी असणारा तो सध्याच्या घडीतील जगातला एकमेव फलंदाज आहे.

कोहलीनं २०१६च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दोन सामन्यांत अर्धशतक झळकावली होती. तब्बल पाच वर्षांनी त्यानं या मालिकेत सलग दोन सामन्यांत ५०+ धावा केल्या. विराटचे हे ११२ वं आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठरलं.