"विराट कोहली हुकूमशाहा, तर त्याला कर्णधारपद सोडावं लागणार," या माजी क्रिकेटपटूचे विधान

Virat Kohli News : इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून विराट कोहली पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरू व्हायला आता केवळ काही दिवसांचा अवधी राहिला आहे. जसजशी ही मालिका जवळ येत आहे तसे दोन्हीकडच्या आजी-माजी खेळाडूंमध्ये वाकयुद्धालाही उधाण येऊ लागले आहे.

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून भारताचा कर्णधार विराट कोहली पितृत्व रजेनंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीलाच टीकेचे लक्ष्य केले गेले आहे.

इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसर याने विराट कोहलीचा उल्लेख हुकूमशाहा असा केला आहे. तसेच पुढील टी-२० विश्वचषक न जिंकल्यास त्याला कर्णधारपद सोडावे लागणार आहे, असे भाकित पानेसर याने केले आहे.

विराट कोहलीला हुकूमशाही वर्तन आवडते. मात्र आता त्याला दुसऱ्यांचे ऐकावे लागणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विराटला रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांचे म्हणणे ऐकावे लागणार आहे, असे मॉन्टी पानेसर याने म्हटले आहे. अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माने ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केलीय. ते नेतृत्वही चांगले करतात, त्यामुळे विराट कोहलीला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल, असा पुनरुच्चार त्याने केला.

पानेसर पुढे म्हणाला की, भारतीय संघाने देशांतर्गत मालिकेत चांगली कामगिरी केली नाही आणि भारतात होणारा टी-२० विश्वचषक जिंकला नाही तर विराटला कर्णधारपद सोडावे लागणार आहे. विराटची कप्तानी पणाला लागली आहे आणि त्याला विश्वचषक किंवा टी-२० विश्वचषक यापैकी एक जिंकावाच लागेल.

विराट कोहलीने भारताचे कर्णधार स्वीकारल्यापासून एकही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. २०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. तर २०१९ च्या विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभूव व्हावे लागले होते.

इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून विराट कोहली पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

Read in English