रोहितची मस्करी, दिनेश कार्तिकने मनावर घेतली; T20 WC साठी दावेदारी सांगितली, म्हणाला...

IPL 2024, Dinesh Karthik on T20 WC2024 : १ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा २७ किंवा २८ एप्रिलला होण्याची शक्यता आहे.

निवड समिती प्रमुख अजित आगरकर, कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे या तारखांना बैठक घेणार आहेत आणि त्यात इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील कामगिरीवर चर्चा होईल. नंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघ जाहीर होईल.

ही संघनिवड होण्यापूर्वी अनेक मुद्दे चर्चेत आहेत.. विराट कोहलीचे स्थान, रिषभ पंत, इशान किशन, संजू सॅमसन, लोकेश राहुल यांना संधी मिळेल का, रोहितसोबत सलामीला कोण खेळणार, असे अनेक मुद्दे आहेत. पण, यात आता दिनेश कार्तिकने ( Dinesh Karthik) संघ निवडपूर्वी डोकेदुखी वाढवणारा दावा सांगितला आहे.

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समितीचे लक्ष आहे. त्यामुळे वर्ल्ड कप संघात स्थान मिळवण्यासाठी सर्वच प्रयत्नशील आहेत. विराट कोहलीचा फॉर्म पाहता त्याला वगळण्याची चूक निवड समिती करेल असे वाटत नाही, फक्त तो कोणत्या क्रमांकावर खेळेल हा प्रश्न आहे.

यशस्वी जैस्वाल व शुबमन गिल यांच्यापैकी ज्याचा फॉर्म चांगला त्याची निवड निश्चित आहे. रिषभ पंतच्या कामगिरीवर सर्वांची बारीक नजर आहे, कारण अपघातातून सावरल्यानंतर तो प्रथमच मैदानावर उतरला आहे. त्याने ७ सामन्यांत २ अर्धशतकांसह २१० धावा केल्या आहेत.

त्यामुळे यष्टिरक्षक-फलंदाजांच्या शर्यतीत तो आहे. पण, तो एकटा नाही. त्याला आव्हान देण्यासाठी इशान किशन ( ७ सामन्यांत १९२ धावा), लोकेश राहुल ( ७ सामन्यांत २८६ धावा), संजू सॅमसन ( ७ सामन्यांत २७६ धावा) हे आहेतच, परंतु यात आता ३९ वर्षीय दिनेश कार्तिकनेही दावा सांगितला आहे.

मुंबई इंडियन्सच्या सामन्यात कार्तिकची फटकेबाजी पाहून रोहित शर्माने त्याला चिडवले होते, की तो वर्ल्ड कपसाठी तयारी करतोय... रोहितची ही मस्करी कार्तिकने मनावर घेतलेली दिसतेय.

कार्तिकने ७ सामन्यांत २०५.४५च्या स्ट्राईक रेटने २२६ धावा चोपल्या आहेत. तो म्हणाला, आयुष्याच्या या वळणावर, भारतीय संघाचे नेतृत्व कराणे यापेक्षा आनंदी गोष्ट माझ्यासाठी असू शकत नाही. मी १०० टक्के त्यासाठी तयार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात स्थान मिळवण्यासाठी मी माझं सर्वस्व द्यायला तयार आहे.

संघ व्यवस्थापनातील तीन सर्वोत्तम लोकांवर माझा पूर्ण विश्वास आहे.. अजित आगरकर, रोहित शर्मा व राहुल द्रविड आणि त्यांच्या निर्णयावर... जर त्यांनी माझा विचार केला, तर मी या आव्हानासाठी १०० टक्के तयार आहे, असेही तो म्हणाला.