घरासमोर वडिलांची 'रिक्षा' असायची, आता सिराजने घेतली BMW

टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर वडिलांच्या निधनाची बातमी येऊन धडकली, कोरोना संकटात बायो-बबल नियमांमुळे आणि राष्ट्रीय कर्तव्य असल्यामुळे त्याला वडिलांचं शेवटचं दर्शनही घेता आले नाही... मुलानं टीम इंडियाकडून खेळावं हे स्वप्न त्यानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून पूर्ण केलं.

कसोटी पदार्पणातच दमदार कामगिरी करून संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला... एका रिक्षाचालकाचा मुलगा ते टीम इंडियाचा गोलंदाज असा प्रवास डोळ्यासमोर जेव्हा उभा राहतो, तेव्हा अश्रू अनावर होणे साहजिकच आहे... मोहम्मद सिराज ( Mohammad Siraj ) याची ही कहाणी.

तिसऱ्या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना सिराजच्या डोळे पाणावले होते. आपल्या भावनांना अश्रूंवाटे तो वाट मोकळी करून देत होता.

स्थानिक स्पर्धांमध्ये तो जेव्हा पहिला सामना खेळला तेव्हा त्यानं २० धावा देत ९ विकेट्स घेतल्या आणि त्यासाठी त्याला ५०० रुपये बक्षीस मिळाले होते. क्रिकेटनं दिलेला हा पहिला पुरस्कार होता.

सिराजचे वडील रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी मुलांच्या स्वप्नांत परिस्थिती कधीच आड आणली नाही. मुलांच्या स्वप्नांसाठी ते दिवसरात्र मेहनत करत राहिले. हलाखीच्या स्थितीत साधारण वस्तीत राहून मोहम्मद सिराज मोठा झाला.

मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी सिराजचे वडील मोहम्मद गौस ( ५३ वर्ष) यांचे निधन झाले, त्याला त्यांच्या अंत्यसंस्कारालाही जाता आले नाही. त्यांना फुफ्पुसाशी संबंधित आजार झाला होता.

मोहम्मद शमीनं दुखापतीमुळे माघार घेतली आणि सिराजला कसोटी संघात पदार्पणाची संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात त्यानं दोन्ही डावांत ( २/४० व ३/३७) पाच विकेट्स घेतल्या.

बॉक्सिंग डे कसोटीत पदार्पणात पाच विकेट्स घेणारा तो पहिलाच परदेशी गोलंदाज ठरला. तसेच पदार्पणात गोलंदाजीत ओपनिंग न करताना भारतीय गोलंदाजानं केलेली ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी सय्यद अबीद अली यांनी १९६७मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटीत ११६ धावांत ७ विकेट्स घेतल्या होता.

टीम इंडियानं ऑस्ट्रेलियात मालिका जिंकल्यानंतर मायदेशी सर्वच खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यात आले. सर्वच खेळाडूंवर बक्षिसांचाही वर्षाव होत आहे. कधीकाळी ज्या सिराजच्या दारात वडिलांची रिक्षा उभी असायची, आज त्याच सिराजने आपल्या दारात मेहनतीने आणि संघर्षातून बीएमडब्लू कार उभी केलीय.

महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा हेदेखील भारतीय संघाच्या या विजयावर अतिशय खुष आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेत पदार्पण करणाऱ्या सहा खेळाडूंना महिंद्राची नवी SUV थार गिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आनंद व्यक्त करत ही माहिती दिली.

आनंद महिंद्रा यांनी या खेळाडूंना एसयूव्ही भेट म्हणून देत नव्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल आणि नवदीप सैनी या सहा खेळाडूंना आनंद महिंद्रांकडून भेट मिळणार आहे. त्यामुळे, आणखी एक कार मोहम्मद सिराजच्या घरासमोर उभी राहणार आहे.