... म्हणून हा सर्व आटापिटा; IPL 2020 रद्द होणं BCCIला परवडणारं नाही!

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमावर अनिश्चिततेचं सावट आहे. 29 मार्चपासून सुरू होणारी ही लीग दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यानं पुढील सूचनेपर्यंत लीग स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयला घ्यावा लागला.

आशिया चषक रद्द करून किंवा पुढे ढकलून त्या काळात आयपीएल खेळवण्याचा विचार बीसीसीआय आणि फ्रंचायझी करत आहेत. शिवाय ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा रद्द झाल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएल खेळवण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे.

कोणत्याही परिस्थिती आयपीएल खेळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न असेल आणि त्यासाठी रिकामी स्टेडियममध्ये ( प्रेक्षकांशिवाय) आयपीएल खेळवण्यास बीसीसीआय तयार आहे. आयपीएलमागे मोठं अर्थकारण असल्यानं ती रद्द करणे बीसीसीआयला परवडणारे नाही.

बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाल यांनी आयपीएल न झाल्यास बीसीसीआयला नेमकं किती नुकसान सहन करावं लागेल, हे सांगितलं.

ते म्हणाले,''आयपीएल न झाल्यास बीसीसीआयला प्रचंड महसूल गमवावा लागेल. जवळपास 4022 कोटींचा किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान सहन करावं लागेल.''

''यावर्षी आयपीएल होईल की नाही, याची आम्हालाही खात्री नाही. आम्हाला नक्की किती सामने खेळवता येणार नाही, त्यानंतरच नक्की किती महसूल बुडाला हे सांगू शकतो,''असेही धुमाल यांनी स्पष्ट केलं.

कोरोना व्हायरसमुळे अनेक क्रिकेट संघटनांनी कॉस्ट कटींग केलं आहे. त्यावरही धुमाल यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले,''सध्यातरी आम्ही त्याचा विचार करत नाही. हा आमच्यासमोरील अखेरचा पर्याय आहे. त्यामुळेच नक्की किती नुकसान होतंय, याची चाचपणी आम्ही सुरू केली आहे.''

Read in English