सरकारच्या निर्बंधांमुळे मूर्तीची उंची मूर्तिकारांच्या मुळावर; ७०० मूर्तींचे बुकिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 00:07 IST2020-07-25T00:07:32+5:302020-07-25T00:07:47+5:30
कोरोनाच्या विघ्नासमोर विघ्नहर्त्याला घडवणारे हात हतबल

सरकारच्या निर्बंधांमुळे मूर्तीची उंची मूर्तिकारांच्या मुळावर; ७०० मूर्तींचे बुकिंग
- अनंत पाटील
नवी मुंबई : वर्षभर आपले कौशल्य पणाला लावून साकारलेल्या भव्यदिव्य गणेशमूर्ती आता कलाशाळेत पडून राहणार असल्याने मूर्तिकार आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे लहान मूर्ती बनवण्याचा आदेश राज्य सरकारने काढला आहे. यामुळे कलाशाळेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे नवीन आॅर्डर नोंदवून लहान मूर्ती बनवण्याचा आग्रह धरत आहेत.
रायगड जिल्यातील पेण तालुक्यात १५० मूर्तिकार असून, ४५० कार्यशाळा आहेत. येथून दरवर्षी २५ ते ३० लाख मूर्ती साकारल्या जाऊन देश आणि विदेशात पाठविण्यात येतात. या मूर्तिकला उद्योगातून दरवर्षी सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे सरकारच्या निर्बंधांमुळे मूर्तीची उंची मूर्तिकारांच्या मुळावर आल्याने, पेण आणि नवी मुंबईतील मूर्तिकारांच्या ५ ते १२ फूट उंचीच्या ४,००० ते ५,००० मूर्ती पडून आहेत. त्यामुळे सरकारच्या निर्बंधांमुळे मूर्तीची उंची मूर्तिकारांच्या मुळावर आल्याने त्यांना या वर्षी कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसणार आहे.
नवी मुंबईतील घणसोली येथे सर्वाधिक मूर्ती तयार करणाऱ्या श्रीगणेश कला निकेतन कार्यशाळेत दरवर्षी २,००० ते २,५०० मूर्ती साकारतात. मात्र, सरकारच्या उंचीच्या निर्बंधांमुळे २ आणि ४ फूट उंचीच्या फक्त ७०० मूर्तींची बुकिंग झाल्याची माहिती मूर्तिकार रोहिदास पाटील यांनी दिली.
तयार मूर्तींचे करायचे काय?
राज्यातील मंडळांचे मूर्तिकार ठरलेले असतात. त्यामुळे कलाशाळांत अनेक मोठ्या मूर्तिकारांचे काम वर्षभर सुरूच असते. सरकारच्या आदेशामुळे ही आर्थिक व भावनिक गुंतवणूक यंदा मूर्तिकारांना मोठा फटका देत आहे. शिवाय जवळपास तयार असलेल्या मोठ्या मूर्तींचे आता काय करायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सरकारने गणेशमूर्तीच्या उंचीवर निर्बंध घातल्यामुळे पिढीजात व्यवसाय करणाºया मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
गणेशभक्तांचा जीव धोक्यात येऊ नये, ही मूर्तिकारांचीही भावना आहे. लॉकडाऊन कालावधीत लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी सरकारने काही कडक नियम बनवून अधिक शिस्तबद्ध पद्धतीने घेण्याची व्यवस्था केली असती, तर आम्हा मूर्तिकारांवर ही वेळ आली नसती आणि नवी मुंबई, तसेच पेणमधील मूर्तिकारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले नसते.
-संतोष चौलकर, अध्यक्ष, श्रीगणेश मूर्तिकार संघटना, नवी मुंबई