पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच; उड्डाणपुलांची कामे संपल्यावरच होणार सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 05:53 IST2026-05-01T05:52:34+5:302026-05-01T05:53:20+5:30
वाशी तसेच ईस्टर्न फ्री वेवरून येणारी वाहने यापूर्वी मानखुर्द येथे असलेल्या मोठ्या सिग्नलमुळे बराच काळ त्याच भागात रखडत.

पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच; उड्डाणपुलांची कामे संपल्यावरच होणार सुटका
मुंबई - मानखुर्द येथील क्रेन दुर्घटनेचा भार बुधवारी मोठ्या प्रमाणावर पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीवर आला. त्यामुळे विक्रोळी ते भांडुप या पट्ट्यात वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी आणि संथगती दिसून आली. मात्र या महामार्गावर गेल्या काही महिन्यापासून याच पट्ट्यात वाहतूक सातत्याने संथगतीने होत आहे. ईस्टर्न फ्री वे ते ठाणे अशी थेट जोडणी असणाऱ्या उड्डाणपुलाचे काम संपल्यानंतरच या वाहतूक कोंडीतून दिल्यास मिळेल हे स्पष्ट होत आहे.
वाशी तसेच ईस्टर्न फ्री वेवरून येणारी वाहने यापूर्वी मानखुर्द येथे असलेल्या मोठ्या सिग्नलमुळे बराच काळ त्याच भागात रखडत. परिणामी तेथून टप्प्याटप्प्याने वाहतूक पूर्व द्रुतगती महामार्गावर येत असे. परंतु गेल्या वर्षीपासून मानखुर्द ते पूर्व द्रुतगती महामार्ग असा थेट उड्डाणपूल झाल्याने वाशी आणि फ्रीवेवरून येणारी वाहने कोणत्याही अडथळ्याविना थेट पूर्व द्रुतगती महामार्गावर येत आहेत. त्याचबरोबर दक्षिण दिशेकडून येणारी वाहने पूर्व द्रुतगती महामार्गावरून ठाण्याच्या दिशेने जात असतात. मानखुर्द होऊन वाहने पूर्व द्रुतगती महामार्गावर आल्यावर गोदरेज कंपनीच्या ठिकाणी दोन सिग्नल लागतात. मात्र हे सिग्नल फार मोठे नाहीत. साहजिकच तेथून एकदा वाहने सुटली, की ती विना अडथळा थेट मुलुंड चेक नाक्यापर्यंत जातात. जे व्ही एल आर उड्डाणपुलाच्या खाली काही प्रमाणात वाहतूक कोंडी होते,पण ती फार वेळ नसते.
विक्रोळी ते भांडुप यादरम्यान वाहतूक बराच रखडणे असा प्रकार होत नव्हता. सध्या ईस्टर्न फ्रीवे ते ठाणे दरम्यान हाती घेण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे अनेक ठिकाणी अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे विशेष करून संध्याकाळी आणि सायंकाळी दक्षिण आणि उत्तर दिशेला वाहतूक कोंडी हमखास होते. हा पूल पूर्ण झाल्यानंतरच वाहतूक कोंडी दूर होईल.