“भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण हा महाराष्ट्राचा अपमान, मविआ सरकार उखडून…”; संजय राऊत संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 13:42 IST2026-01-26T13:42:43+5:302026-01-26T13:42:43+5:30
Sanjay Raut News: महाविकास आघाडीचे सरकार उखडून शिंदे-भाजपाचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना केंद्र सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले, अशी टीका संजय राऊतांनी केली.

“भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण हा महाराष्ट्राचा अपमान, मविआ सरकार उखडून…”; संजय राऊत संतापले
Sanjay Raut News: महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र शब्दांत भूमिका मांडली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली.
सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना थेट हात जोडत राम कृष्ण हरी म्हणत, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या काळात महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत काय वक्तव्य केले होते हे आपल्याला माहिती आहे. आमच्यासाठी हे त्रासदायक आहे. शिवाय या कटू आठवणी कायम मनात राहतील, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली.
भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण हा महाराष्ट्राचा अपमान
माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रात लोकशाही आणि संविधानाची हत्या करून मविआचे सरकार उखडून टाकले. त्यांच्या कृतीवर सर्वोच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले होते. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा अपमान केला, त्यांना मोदी सरकार पद्मभूषण देऊन सन्मानित करत असेल, तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हा पुरस्कार संविधानाची हत्या करण्यासाठी दिला आहे का? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली.
दरम्यान, राष्ट्रपतींनी भाषणातून जगाला शांततेचा संदेश दिला असला, तरी सध्या खुद्द आपल्याच देशात आणि सीमेवर अशांतता व अस्थिरतेचे वातावरण आहे. शेजारील बांगलादेशात दररोज हिंदूंच्या नरसंहाराच्या बातम्या येत आहेत, तिथे कालच दोन हिंदूंना जिवंत जाळण्यात आले. अशा भीषण परिस्थितीत केवळ शांततेचे आवाहन करून हे हत्याकांड थांबणार आहे का? जर शांतता प्रस्थापित करायची असेल, तर केवळ उपदेश करून उपयोग नाही; त्यासाठी इंदिरा गांधींनी दाखवले होते तसे धाडस दाखवून लष्करी कारवाई करण्याची गरज आहे, असे राऊत म्हणाले.