मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! मुंबईत १५ मे पासून १० % पाणीकपात; धरणांत केवळ २८.३५ टक्के साठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 11:40 IST2026-04-29T11:39:17+5:302026-04-29T11:40:21+5:30
या पाणी कपातीची झळ ठाणे, भिवंडीतील महापालिका हद्दीतील रहिवाशांनाही बसणार आहे.

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! मुंबईत १५ मे पासून १० % पाणीकपात; धरणांत केवळ २८.३५ टक्के साठा
मुंबई - कडक उन्हामुळे धरणांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर होत असलेले बाष्पीभवन आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत सध्या उपलब्ध असलेला २८.३५ टक्के पाणीसाठा लक्षात घेता अखेर मुंबई महापालिकेने १५ मे पासून १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे सातही धरणांतील पाणीसाठ्यामुळे १७ ऑगस्टपर्यंत मुंबईची तहान भागेल. मात्र, भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठाही ६ जुलैपर्यंत पुरेल इतकाच आहे.
‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. त्यामुळे १५ मे पासून मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली. या पाणी कपातीची झळ ठाणे, भिवंडीतील महापालिका हद्दीतील रहिवाशांनाही बसणार आहे.
सद्य:स्थिती काय?
मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणांत चार लाख १० हजार ३५७ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा १७ ऑगस्टपर्यंत मुंबईकरांची तहान भागवू शकतो. एकूणच परिस्थितीचा अंदाज घेऊन भविष्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन म्हणून १५ मे पासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार असल्याचे भिडे यांनी सांगितले.
ठाणे, भिवंडीतील गावांना १५० दशलक्ष लिटर पुरवठा
मुंबई पालिकेकडून ठाणे आणि भिवंडीत १५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. या भागातील लोक घरगुती व व्यावसायिक कामासाठी या पाण्याचा वापर करतात. मुंबई पालिका लागू करत असलेल्या पाणी कपातीचा फटका या महापालिका व त्यांच्या परिसरातील गावांनाही बसणार आहे.