"आज बाळासाहेब असते तर व्यथित झाले असते, मी काय बोलून गेलो म्हणाले असते", राज ठाकरेंनी कुणाला सुनावले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 20:25 IST2026-01-23T20:21:59+5:302026-01-23T20:25:42+5:30
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त श्री षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि सध्याच्या हिंदुत्त्वाच्या वातावरणावरून खडेबोल सुनावले.

"आज बाळासाहेब असते तर व्यथित झाले असते, मी काय बोलून गेलो म्हणाले असते", राज ठाकरेंनी कुणाला सुनावले?
"बाळासाहेब म्हणाले, असते मी काय बोलून गेलो. मी काय सांगत होतो, मी तुम्हाला काय म्हणत होतो आणि हे आता कुठच्या परिस्थितीत तुम्ही आणलं आहे? एखादी गोष्टी, जेव्हा एखादा माणूस घडवतो आणि ती घडवल्यावर त्याचे पुढे बाकीचे लोक काय करतात, हा देश त्याचे एक उदाहरण आहे", अशा भावना व्यक्त करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे भाजपाला सुनावले.
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम मुंबईतील श्री षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी भाजपाचे नेते स्वर्गीय प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात घडलेला किस्सा सांगितला.
"हिंदूंना हिंदू म्हणून मतदान करायला लावेन"
राज ठाकरे म्हणाले, "मला एक छोटा प्रसंग आठवतो, प्रमोद महाजनांनी सांगितलेला. बाळासाहेब कलानगरमध्ये फेऱ्या मारायचे. मला वाटतं ही गोष्ट असेल, १९८४-८४ सालची. त्यावेळी प्रमोद महाजनांना बाळासाहेब असे म्हणाले होते की, प्रमोद या देशातील हिंदूंना एक हिंदू म्हणून मतदान करायला लावेन आणि हिंदू मतदार तयार होतील."
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, "प्रमोद महाजन त्यावर म्हणाले, बाळासाहेब हे शक्य नाही, या देशात. बाळासाहेब बोलले, तू मला ओळखत नाहीस. बाळासाहेबांनी या देशामध्ये हिंदूंना हिंदू एक राजकीय शक्ती बनू शकते हे सिद्ध करून दाखवले. तोपर्यंत इतरांना कुणाला माहिती पण नव्हते. कल्पना देखील नव्हती. भारतीय जनता पक्षाला देखील नाही."
'हिंदूत्वाचा बाजार बघून बाळासाहेब व्यथित झाले असते'
"त्यावेळचे वातावरण वेगळे होते. त्यावेळचे वातावरण हे तयार केलेले नव्हते. ते तयार झालेले वातावरण होते. त्या वातावरणामध्ये बाळासाहेबांनी तो विचार जेव्हा देशामध्ये फुंकला. त्याच्यानंतर जे यश सर्वार्थाने यायला लागलं. आज जर बाळासाहेब असते, तो जो हिंदुत्वाचा सगळ्या ठिकाणी जो काही बाजार मांडून ठेवला आहे. तो पाहिला असता तर निश्चित व्यथित झाले असते", अशी खंत राज ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलताना व्यक्त केली.
'दुसऱ्याचे वाभाडे काढण्यासाठी जागृत केले नाही'
"बाळासाहेबांनी ज्या तडफेने, निष्ठेने ते विचार मांडले. खासकरून महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाबद्दलचे मांडले. हिंदूंना त्यांनी हिंदू म्हणून जागृत केले, दुसऱ्यांचे वाभाडे काढण्यासाठी नव्हे, स्वतःच्या स्वाभिमानासाठी केले. मला असं वाटतं की, तो स्वाभिमान, ते प्रेम आपण सतत सगळेजण जागृत ठेवू. अशी मला एक आशा, अपेक्षा आहे", अशा भावना राज ठाकरेंनी यावेळी मांडले.