खारमध्ये झाड पडल्यामुळे जखमी मुलीचा अखेर मृत्यू; आठवडाभर मृत्यूशी झुंज अपयशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 08:12 IST2026-05-18T08:12:12+5:302026-05-18T08:12:34+5:30
दुसरी तरुणी अतिदक्षता विभागात

खारमध्ये झाड पडल्यामुळे जखमी मुलीचा अखेर मृत्यू; आठवडाभर मृत्यूशी झुंज अपयशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खार परिसरात रिक्षावर झाड कोसळून गंभीर जखमी झालेल्या १५ वर्षीय आरिका श्रीवास्तव हिचा रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या सात दिवसांपासून ती हिंदुजा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. या दुर्घटनेतील दुसरी गंभीर जखमी तरुणी हर्षिता कुमार हिची प्रकृती अद्याप चिंताजनक असून, तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
१० मे रोजी खार परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारातील झाड अचानक रस्त्यावरून जाणाऱ्या ऑटोरिक्षावर कोसळले. त्या वेळी मनस्वी श्रीवास्तव (वय १९), तिची धाकटी बहीण आरिका आणि हर्षिता कुमार या तिघी जेवणासाठी बाहेर जात होत्या.
अचानक झाड कोसळल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले आणि तिघी गंभीर जखमी झाल्या. या अपघातात मानसवीच्या पायाला फ्रॅक्चर झाले, तर आरिका आणि हर्षिता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दोघींनाही कवटीला फ्रॅक्चर होऊन त्या बेशुद्ध झाल्या होत्या. रिक्षाचालकाने तातडीने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. आरिका हिच्यावर गेल्या आठवडाभर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, रविवारी सकाळी ६:०५ वाजता तिचा मृत्यू झाला.
बांधकाम कंपनीविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा
या घटनेनंतर खार पोलिसांनी संबंधित बांधकाम प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या बांधकाम कंपनीविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
आरिका बहीण मनस्वी हिने दिलेल्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला.
पालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर प्राथमिक तपासात बांधकामासाठी वापरण्यात येणारे
दगड आणि साहित्य झाडाच्या मुळांजवळ साठवून ठेवण्यात आल्याचे समोर आले.
‘वैद्यकीय पथकाने केले सर्वतोपरी प्रयत्न’
हिंदुजा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, वैद्यकीय पथकाने आरिका श्रीवास्तव हिची प्रकृती स्थिर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.
परंतु, गंभीर दुखापतींमुळे सात दिवसांच्या संघर्षानंतर तिची प्राणज्योत मालवली. तर, डॉक्टरांनी हर्षिता कुमार हिची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे स्पष्ट केले आहे.
‘ट्री एम्बोलिझम’मुळे वृक्ष कोसळण्याच्या घटना
मुंबईत अलीकडे झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर महापालिकेने यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच झाडांना पाणी देण्याची विशेष मोहीम सुरू केली आहे. महापालिकेच्या अंतर्गत तपासात वाढते तापमान आणि ‘ट्री एम्बोलिझम’ ही समस्या झाड कोसळण्यामागील प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे.