"तुम्ही आज तीन तासांसाठी बाहेर पडलात; लगेच नरेंद्र मोदींशी तुलना करून घेऊ नका"

By मुकेश चव्हाण | Published: October 19, 2020 07:02 PM2020-10-19T19:02:45+5:302020-10-19T19:29:40+5:30

उद्धव ठाकरे यांच्या सोलापूरमधील नुकसान ग्रस्त पाहणी दौऱ्यावरही देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधला आहे.

Former Chief Minister Devendra Fadnavis has criticized CM Uddhav Thackeray | "तुम्ही आज तीन तासांसाठी बाहेर पडलात; लगेच नरेंद्र मोदींशी तुलना करून घेऊ नका"

"तुम्ही आज तीन तासांसाठी बाहेर पडलात; लगेच नरेंद्र मोदींशी तुलना करून घेऊ नका"

Next

मुंबई: अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार राज्याला सहाय्य करेलच. पण राज्य सरकारनं टोलवाटोलवी न करता आधी मदतीची घोषणा करावी, असं विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच मदतीसाठी केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत द्यावी. सोयीस्कर भूमिका घेऊ नये. सगळंच केंद्रावर ढकलायचं असेल, तर मग राज्य सरकार कशासाठी आहे, त्यांचं काम काय, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे राज्य चालवायला हिंमत लागते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थिल्लरपणा करु नये, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सोलापूरमधील नुकसान ग्रस्त पाहणी दौऱ्यावरही देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधला आहे. तुम्ही आज तीन तासांसाठी बाहेर पडलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी लडाखला जातात. त्यामुळे तुम्ही लगेच नरेंद्र मोंदीची तुलना करुन घेवू नका, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

दरम्यान, अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी, काही शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंतही पावसाच्या पाण्यामुळे जाता येत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. तसेच, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील रस्ता पूर्णपणे खचला असून घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे, त्याला तातडीने मदत करण्याची गरज असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. यावेळी, पाण्यातून आणि चिखलातून वाट काढत फडणवीस यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा देखील देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या. 

सरकारकडून जे शक्य आहे ते करणार-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत, पुढील २-३ दिवसांत माहिती गोळा करण्याचं काम होईल. त्यानंतर सरकारकडून जे शक्य आहे ते करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिले आहे.  विदर्भ पूर, निसर्ग चक्रीवादळ येथेही मदत केली आहे, परतीच्या पावसाचं संकट टळलं नाही, आणखी काही दिवस अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे, त्यामुळे नुकसान किती होतेय याचा अंदाज आला आहे, सरकार लवकरच मदत करेल अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली. सोलापूरमधील नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी करताना उद्धव ठाकरेंनी हे आश्वासन दिले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, पावसाळा सुरुवात झाल्यापासून मी सातत्याने संपर्कात आहे, नुकसान किती होतेय, पावसाचा अंदाज याची माहिती घेत होतो, टार्गेट दिल्यासारखं पाऊस सगळीकडे पडतोय. शेतकरी आणि आपत्तीग्रस्त हे संकटाच्या डोंगराखाली अडकलेले आहेत. त्या लोकांना दिलासा आणि धीर देण्यासाठी आम्ही इथं आलो आहे. सरकारकडून जे जे काही करणे आवश्यक आहे ते लोकांसाठी आम्ही करू, हे सरकार तुमचं आहे. परतीचा पाऊस आणखी किती दिवस चालेल, त्याचा फटका कितपत बसेल याचा अंदाज आला आहे. दुर्दैवाने ज्यांच्या घरातील माणसं दगावली त्यांना काही दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, असं उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.

Web Title: Former Chief Minister Devendra Fadnavis has criticized CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.